| नेरळ | प्रतिनिधी |
खंडाळा येथे बोरघाटात उगम पावलेल्या उल्हास नदीला जलपर्णीच्या विळखा पडला आहे. नदीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साठून राहिले आहे, त्या ठिकाणी जलपर्णीमुळे नदीच्या पाण्यावर हिरवी शेती केल्याचा चित्र दिसून येत आहे. जलपर्णीमुळे नदीचे पाणीदेखील प्रदूषित होत असून, जलपर्णीमुळे नदीचे प्रदूषण वाढले आहे. दरम्यान, या जलपर्णीने पाण्यावर हिरवा तवंग निर्मण झाला असून, परिणामी नदीच्या पाण्यातील जीवांना ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे.
उल्हास नदीचे पाणी हे ठाणे जिल्ह्यातील पिण्याचे पाणी म्हणून वापरात आणले जाणारे पाणी आहे. त्या पाण्यामध्ये सांडपाणी वाहून जात असल्याने नदीचे पाणी सातत्याने प्रदूषित होत असल्याची बोलले जात आहे. कर्जतपासून उल्हास नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडले जात असल्याने कर्जतपासूनच उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्यात हिरवेगार तवंग दिसून येत होते. आता तर ठाणे जिल्ह्यात हे हिरवे तवंग जाऊन पोहोचले असून, उल्हास नदीमध्ये बदलापूर शहरातील भागात मोठ्या प्रमाणात पाण्यावर जलपर्णी उगवली आहे. या जलपर्णीबद्दल पर्यावरण प्रेमी यांच्याकडून नाराजी व्यक्त होत असून, उल्हास नदीचे प्रदूषण थांबवावे, असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीदेखील स्थानिक प्रशासनाकडून उल्हास नदीचे प्रदूषण थांबवावे यासाठी केवळ कागद नाचविण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबद्दलदेखील नाराजी आहे.
उल्हास नदीच्या पाण्यावर जलपर्णी उगवल्या असल्याने त्याचा सार्वधिक परिणाम पाण्याखाली असलेली जीवांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. त्याचे कारण पाण्यातील त्या जीवांना ऑक्सिजन मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर नदीमधील मासे हे मरून पाण्याबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. तर, अन्य ठिकाणी मासे हे त्या पाण्याच्या बाहेर डोकावून सूर्यप्रकाश घेऊन पुन्हा पाण्यात गडब होऊन जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे उल्हास नदीच्या पाण्यावर निर्माण झालेल्या जलपर्णींना हटवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी याबाबत प्रशासन आणि राज्याचे मुख्यमंत्री या जलपर्णीबाबत काही निर्णय घेणार काय, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.