करोडोंची पाणीयोजना रामभरोसे

तळा शहराचा पाणीप्रश्‍न रेंगाळला

| तळा | वार्ताहर |

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत तळा शहरासाठी 13 कोटी 70 लाख रुपये खर्चाची नवीन पाणी योजना मंजूर झाली. या योजनेचे भूमीपूजन दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. या भूमीपूजनास राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना पक्षातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. आज या सोहळ्याला आठ महिन्यांचा कालावधी लोटून गेला; परंतु अजूनही या योजनेला गती आलेली नाही. काम कासव गतीने सुरू आहे. प्रशासन कंत्राटदाराला जावयाप्रमाणे वागणूक देते, असा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. अशा धीम्या गतीने काम सुरू राहिल्यास तळा शहर पाणीपुरवठ्याची योजना कधी यशस्वी होणार, असा सवाल करत जनतेने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रशासनास लक्ष केले आहे.

तळा शहरासाठी वावे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत तेरा कोटी सत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाचे कंत्राट वैष्णवी कन्स्ट्रक्शन बारामती पुणे या कंपनीला दिले आहे. मार्च 2024 रोजी काम सुरू कण्याचे आदेश या कंपनीला शासनाकडून देण्यात आले; परंतु सध्या हे काम रामभरोसे आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिन्यांचा आहे. त्यातील आठ महिने निघून गेले. जेव्हा कंत्राटदाराच्या मनात येते, तेव्हा तो काम सुरू करतो. हे काम करत असताना कोणते नियोजन, मोजमाप न करता मनमानी पद्धतीने काम केले जात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. नगरपंचायत पाणीपुरवठा विभागाचा इंजिनियर या ठिकाणी फिरकत नसल्यामुळे ही योजना यशस्वी झालेली नाही, असेही बोलले जात आहे. या योजनेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. केवळ विहीर बांधण्यासाठी इतकी दिरंगाई होत असेल, तर उर्वरित शहरातील काम कधी पूर्ण करणार? असेच काम होणार का, याबाबतीत सविस्तर माहिती सत्ताधारी आणि प्रशासनाने द्यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

नगरपंचायतीत विरोधी पक्ष नसल्याने प्रशासन सुस्त झाले आहे. ठेकेदारावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नसल्याने नगरपंचायतीने रस्त्यासाठी खर्च केलेले 55 लाख रुपये ज्याप्रमाणे पाण्यात गेले, त्याचप्रमाणे 13 कोटीदेखील पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही योजना फक्त पाणी अडवा पैसे जिरवा यासाठीच आहे की काय? अशी शंका तळावासीय व्यक्त करत आहेत.

पाणीसमस्या असल्यामुळे शासकीय, निमशासकीय अधिकारी यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, इतर कर्मचारी इंदापूर माणगावसारख्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. या सर्व चाकरमान्यांची आर्थिक उलाढाल इतर तालुक्यात होत असल्याने तळा बाजारपेठेवर त्याचा मोठा फटका बसत आहे. नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येऊन अडीच वर्षांचा कालावधी लोटला; परंतु शहराचा पाणीप्रश्‍न अजून रेंगाळला असल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

पाणीसमस्येमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर
उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा, तळा शहरवासियांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. नगरपंचायतीच्या ताब्यात येथील पाणीपुरवठा गेला आणि दुदैवाचा फेरा सुरू झाला. गेल्या वीस-बावीस वर्षांपासून एक दिवसाआड पाणी मिळते. उन्हाळ्यात दरवर्षी पाण्याच्या नावाने बोंबच असते. विशेष म्हणजे, पाणीपट्टी वाढवून कुठल्याच प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिलेल्या नाहीत. आजही काही परिसरातील भागात तीन-चार दिवसांनंतर पाणी आले, पण ते पुरेसे नाही आणि विशेष म्हणजे तीन-चार दिवसांची साठवण करणे अवघड आहे.
Exit mobile version