| रसायनी | वार्ताहर |
पाताळगंगा नदीवर नव्याने तीन वर्षांपूर्वी पूल उभारला आहे. यातच जुन्या पुलावरील रहदारी बंद आहे. परंतु, नवीन पुलावरील लोखंडी शिगा बाहेर पडत असल्याने वरच्यावर मलमपट्टी करून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.
दोन वेळा नवीन पुलाच्या लोखंडी शिगा दिसू नयेत म्हणून तीन महिन्यांत दोनदा तात्पुरती डांबरमिश्रित माल टाकून पुलावरील शिगा झाकल्या जात आहेत. परंतु, पुन्हा जेसे थेच परिस्थिती यामुळे किरकोळ अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. तीन वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाची अवस्था पाहता वाहनचालक व नागरिकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. औद्योगिक क्षेत्राकडे येणार्या-जाणार्या वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहने, दुचाकी व तीन-चाकीस्वार यांची रेलचेल या पुलावरून चालू असते. पुलाच्या मधोमधच लोखंडी शिगाजवळ खड्डा पडत असल्याने तो चुकविताना दुचाकी स्वाराची त्रेधा उडत आहे. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु, एमआयडीसी प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने एखादा मोठा अपघात झाल्यास एमआयडीसी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. शिवाय पाताळगंगा नदीवरील जुन्या पुलाचे बांधकाम लवकर सुरू न केल्यास पत्रकार आंदोलनन छेडतील, असा इशारा पत्रकार राकेश खराडे यांनी एमआयडीसी प्रशासनाला लेखी दिला आहे.
पाताळगंगा नदीवरील नवीन पुलाचे काम निकृष्ट
![](https://krushival.in/grygrars/2023/01/patalganga-1024x363.jpg)