आदिवासी भगिनींच्या कष्टाचं सोनं
| माणगाव | सलीम शेख |
कोकणातील डोंगररांगा, घनदाट जंगल आणि उन्हाने तापलेली माती या साऱ्या कठीण परिस्थितीतही जगण्याची लढाई जिंकण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणगाव तालुक्यातील आदिवासी भगिनींच्या हातात आज रानमेव्याचे सोनं दडले आहे. सध्या माणगावच्या बाजारपेठेत काजूच्या ताज्या बियांना मोठी मागणी निर्माण झाली असून, त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने बाजारपेठेची दाद मिळताना दिसत आहे.
माणगाव तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात राहणारे आदिवासी बांधव रणरणत्या उन्हात, पायवाटांनी आणि जंगलवाटांनी फिरत काजूच्या बिया, करवंदे, जांभळे, कैऱ्या आणि इतर रानभाज्या गोळा करतात. हा रानमेवा म्हणजे त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा मुख्य आधार बनला आहे. सध्या बाजारात 100 काजूच्या बियांना 200 ते 350 रुपये असा दर मिळत आहे. आकारमानानुसार हा दर बदलतो. जूनपर्यंत हा छोटासा पण महत्त्वाचा व्यवसाय बहरात असतो. विशेष म्हणजे मुंबई, ठाणे, पुणेसह संपूर्ण कोकणातून येणारे पर्यटक आणि प्रवासी माणगाव येथे थांबून आवर्जून हा रानमेवा खरेदी करत आहेत. या आदिवासी महिला भगिनी महामार्गाच्या कडेला उन्हात बसून विक्री करतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असला तरी डोळ्यांत आशेची चमक दिसते. काजूच्या बिया गोळा करताना त्यांना घनदाट जंगलात जावे लागते. वाघ, बिबट्या, रानडुक्कर यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा धोका कायम डोळ्यासमोर असतो. काजूच्या बियांचे कवच काढताना हातांची कातडी सोलली जाते, बोटांना जखमा होतात. या प्रक्रियेमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तरीही कुटुंबाच्या पोटासाठी त्या न डगमगता काम करत राहतात.
या हंगामात काजूच्या बियांबरोबरच गावरान करवंदे, जांभळे, आंबे, कैऱ्या आणि विविध रानभाज्या उपलब्ध आहेत. हा रानमेवा केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यदायीही आहे. रासायनिक प्रक्रियेपासून दूर असलेला हा अस्सल निसर्गदत्त आहार शहरातील नागरिकांना आकर्षित करीत आहे. या मेहनती आदिवासी भगिनींना आणि बांधवांना कायमस्वरूपी व सुरक्षित बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शासनाने किंवा स्थानिक प्रशासनाने त्यांच्यासाठी संरक्षित विक्री केंद्रे, सावलीची व्यवस्था आणि योग्य हमीभाव निश्चित केल्यास त्यांच्या जीवनात मोठा बदल घडू शकतो. हमीभाव आणि नियोजनबद्ध विक्री व्यवस्थेमुळे या रानमेव्याला योग्य मूल्य मिळेल, रोजगारनिर्मिती वाढेल आणि आदिवासी समाज आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करेल. संघर्षमय जीवनातून बाहेर पडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याची त्यांची स्वप्ने साकार होतील. माणगावच्या मातीत उगवणाऱ्या या काजूच्या बियांमध्ये केवळ चव नाही, तर त्या प्रत्येक दाण्यात आदिवासी भगिनींच्या घामाचा, संघर्षाचा आणि आशेचा सुगंध दडलेला आहे.







