मास्कविना शिवतीर्थावर प्रवेश नाही

 कोरोना रोखण्यासाठी सीईओ डॉ. किरण पाटील यांचे निर्देश
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन निर्बंध शिथील करताना तितकीच दक्षता घेण्याचेही सरकारने ठरवले असून, त्याचाच भाग म्हणून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व आस्थापनांनी  या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
 सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणार्‍या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील,असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या सर्व कार्यालयांमध्ये सेवेत असलेल्या कर्मचारी व अधिकारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्र पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख वा आस्थापना प्रमुख यांनी करावी. लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांकडून घ्यावे. ज्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणासाठी काही अडचण असल्यास लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित करावे किंवा नजीकचे केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून त्याची पूर्तता करून घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


अन्यथा दंडात्मक कारवाई
मास्कचा सुयोग्य वापर आणि लसीकरण पूर्ण करून घेणे यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख वा कार्यालय प्रमुख यांनी आस्थापना अधिकारी किंवा अधिकार्‍याला नामनिर्देशित करावे. सर्व कार्यालयांत मास्क अनिवार्य असल्याने कर्मचारी, अधिकारी किंवा अभ्यागत हे कार्यालयात किंवा आवारात विनामास्क आढळल्यास संबंधित नामनिर्देशित अधिकार्‍याला नियम मोडणार्‍याकडून दंड वसुलीचे अधिकार असतील. दंड आकारणी केल्यावर त्याची पावती दिली जाईल. ती रक्कम कार्यालयातील संबंधित अधिकार्‍याकडे जमा होईल व तिथून महसुलात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व आस्थापनांनी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
डॉ. किरण पाटील,सीईओ,रायगड

Exit mobile version