। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर शेलू गावाजवळ सार्वजनिक बांधकाम खात्यान पाच कोटी रुपये खर्चून मोठा पूल बांधला आहे. त्या पुलाच्या निर्मितीसाठी शासनाने तब्बल पाच कोटींचा निधी खर्च केला आहे. मात्र, त्या पुलाच्या दोन्ही बाजूंचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग मागील वर्षभरात बांधून पूर्ण करू शकले नाही. दरम्यान, रस्त्यासाठी शेलू बाजूकडे आणि पलीकडे निकोप मोहाली गावाकडे स्थानिक शेतकर्यांनी जमीन देण्याची गरज आहे. मात्र, शेतकरी जमीन देत नसल्याने रस्ता बनला जात नाही. त्यामुळे शेलू ग्रामस्थ रस्त्यासाठी जमीन देणार काय? हा प्रश्न कायम आहे.
या पुलाच्या मानिवली ग्रामपंचायत बाजूकडील रस्ते हे माळरानातून त्या पुलाजवळ पोहचत आहेत. त्यामुळे त्या बाजूचा रस्ता तयार करायला कोणत्याही अडचणी नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, शेलू गावाच्या बाजूला अस्तीत्वात असलेला रस्ता हा अगदी अरुंद आहे. त्यात सध्याचा रस्ता हा शेलू गावातून जात असून गावातील बहुसंख्य रस्ते हे अरुंद असल्याने मोठी वाहने त्या रस्त्याने जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेलू गावाच्या बाहेरून रस्ता काढल्यास तो रस्ता थेट रेल्वे फाटकात पोहचु शकतो आणि हाच रस्ता भविष्यातील नियोजनासाठी महत्वाचा असणार आहे. मात्र, त्या पूर्ण 600-700 मीटर रस्त्यावर शेलू गावातील ग्रामस्थांच्या शेत जमीन आहेत. त्यामुळे शेत जमिनीमधून रस्ता करायला जागा कोण देणार? असा प्रश्न आहे.