| संभाजीनगर | प्रतिनिधी |
आमचं बंद दाराआड काही नसतं. दक्षिण मुंबईची जागा मनसेनं मागितली होती, आणि ती द्यायला ते तयारही झाले होते. मात्र, पक्ष चिन्ह त्यांचं वापरण्याची अट असल्यानं आम्ही निवडणूक लढवली नाही. आम्ही केवळ त्यांना पाठिंबा दिला, असं नांदगावकर यांनी सांगितलं. राज्यात आता महायुतीसोबत असल्यानं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही तन आणि मनाने सोबत आहोत, आम्ही सत्तेत नसल्यानं आमच्याकडे धन नाही त्यामुळे ते तुम्ही बघा असा सल्ला त्यांनी महायुतीतील उमेदवारांना दिला. तर आमचा योग्य सन्मान राखा, असंही त्यांनी सांगितलं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शनिवारी (दि.20) एप्रिल मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्याला मंत्री संदिपान भुमरे यांची देखील उपस्थिती होती. तर महायुतीच्या प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाच्या बॅनरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो नसल्यामुळं मनसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं. त्यामुळं त्यांची मनधरणी करण्यासाठी हा मेळावा होता. तर यावेळी ‘फोटोसाठी विचार न करता आता सर्वांनी एकमतानं काम करा’, असं आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं.