| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात मतदान केंद्रातील कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कसोशीने काम केले. मतदान हे सर्वश्रेष्ठ अधिकार व कर्तव्य मानून प्रशासनाकडून विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या. यावेळी पनवेलमधील माची प्रबळ सारख्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातही मतदान केंद्र सुरू करण्यात आली आहेत.

डोंगर चढून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम यंत्रे व आवश्यक साहित्य सुरक्षितपणे मतदान केंद्रांवर पोहोचवले. अवघड रस्ते, निसर्गमय वातावरण आणि प्रतिकूल परिस्थिती असूनही कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. दुसरीकडे, सकाळपासूनच मतदार राजाने मतदान केंद्रांकडे वाट धरली. दुर्गम भागातील नागरिकांनीही लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.







