। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील शिंदे, फडणवीस सरकार हे धोका देणार्यांचे सरकार असल्याची टीका अपक्ष आ.बच्चू कडू यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला आहे. विस्तारामध्ये कोणत्याही अपक्ष नेत्याला संधी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे कडू नाराज आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे हे धोका देणार्यांचं राज्य असून, धोका देईल तोच मोठा नेता होतो. त्यालाच मंत्रीपद मिळते असे उपहासात्मक भाष्य बच्चू कडू यांनी केले आहे.
बच्चू कडू हे एकनाथ शिंदे यांचे सहकारी आहेत. बच्चू कडू यांचे काही मत असेल तर चर्चा होईल. लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. तो त्यांच्यापर्यंत मर्यादित ठेवावा, असे आशिष शेलार म्हणाले. धोका देणार्यांनी या महाराष्ट्राची बदनामी देशभरात केली. काँग्रेसच्या तत्कालीन नेतृत्वापासून कोणाच्या पाठीत कोणी खंजीर खुपसला, धोका कोणी केला, अंतर्गत काँग्रेसमध्ये कोणी धोका दिला, याची माहिती बच्चू कडू यांनी घ्यावी, असे म्हणत आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली.