काँग्रेस जिल्हाध्यक्ष घरत यांचा आरोप
। श्रीवर्धन । (समीर रिसबूड) ।
रायगडच्या राष्ट्रवादीमध्ये आज जे कोणी आहेत ते अंतुले यांचे चेले आहेत. हे सर्व काँग्रेसमुळेच मोठे झाले तेच आता आपल्या डोक्यावर बसले आहेत, अशी टीका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी श्रीवर्धन येथे करीत खा. सुनिल तटकरे यांच्यावर निशाणा साधला. रायगड जिल्हा काँग्रेसची बैठक श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी या बैठकीस वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष अखलाक सिलोत्री, किरीट पाटील, मार्तंड नाखवा, मुरलीधर ठाकुर, रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्षा शबिस्ता सरखोत, रायगड जिल्हा कमिटी सदस्य प्रभाकर वाडकर हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना महेंद्र घरत यांनीहा रायगड जिल्हा अंतुले साहेबांच्या काँग्रेस पक्षाच्या नावाने ओळखला जातो. आजही जिल्ह्यात अंतुले साहेबांची आठवण कार्यकर्ते काढतात. साहेबांनी हजारो युवकांना नोकरीला लावले.कारखाने कुठलेही आणले नाही पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वारसांना काम दिले.आज दुःख ह्याच होत आहे की रायगड जिल्ह्यात आपला एकही आमदार नाही.आज मी बैठकीत सांगतो जेव्हा रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे दोन आमदार निवडून येतील तीच खरी बॅरिस्टर अंतुले साहेबांना खरी श्रध्दांजली ठरेल. असे घरत यांनी जाहीर केले. अंतुले यांचे श्रीवर्धन येथील सहकारी प्रभाकर वाडकर यांचे कौतुक करतांना घरत यांनी सांगितले की ह्या माणसाला कुठलेही मोठे पद दिले नाही तरी ही वाडकर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. अशा कार्यकर्त्यांचा आम्हांला अभिमान आहे. श्रीवर्धन शहरात पक्ष वाढवायचा आहे. शुन्यातून विश्व निर्माण करायचे आहे. या करिता आज बैठकीचे आयोजन केले होते. बैठकी दरम्यान मोहंमद सादीक राऊत यांची श्रीवर्धन तालुकाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
अंतुले यांनी ज्यांना राजकारणाची बाराखडी शिकवली ते रामशेठ ठाकूर, रवीशेट पाटील, प्रशांत ठाकूर कॉग्रेस पक्ष कमकुवत होतोय अस वाटायला लागल्यावर आपली साथ सोडून गेले. या तिघांना बंद गाडीत बसायला आवडतं नाही चालू गाडीत बसायला आवडतं. काँग्रेस पक्ष संपला या भितीने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ज्या रवीशेट पाटलांना साहेबांनी जिल्हाध्यक्ष केल, मंत्री केलं अशा लोकांनी पक्ष सोडला याच वाईट वाटतं.