| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका निवडणुकीत पक्षांतर करणाऱ्या उमेदवारांना मतदारांनी चांगलाच धडा शिकविल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेषतः शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या शेकापला सोडून सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने मतदार नाराज झाल्याचे निकालांतून स्पष्ट झाले आहे. मंजुळा कातकरी, अरुणा दाभणे आणि सारिका भगत या उमेदवारांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारले. अरुणा दाभणे यांनी शेकाप सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता; मात्र हा निर्णय त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अंगलट आला.
या निकालांमुळे पक्षनिष्ठेला मतदार अजूनही महत्त्व देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्नांवरील भूमिका आणि सातत्यपूर्ण संपर्क यापेक्षा केवळ पक्षबदल करून निवडणूक जिंकता येत नाही, असा संदेश मतदारांनी दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, शेकाप कार्यकर्त्यांमध्ये या निकालामुळे नवचैतन्य संचारले असून, भविष्यात पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न वाढविण्यात येणार असल्याचे पक्ष नेत्यांकडून सांगण्यात आले. पनवेलमधील या निकालांचा परिणाम येत्या काळातील स्थानिक राजकारणावर निश्चितच दिसून येणार आहे.





