| पनवेल | वार्ताहर |
एसटी बस आगाराच्या परिसरात तीन बांगलादेशी नागरिकांना पनवेल शहर पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ताब्यात घेतले आहे. या तिघांची नावे अली हाफीज शेख, रबीवुल मनन शेख, मेसन किसलू मुल्ला अशी आहेत. हे तिघेही काही महिन्यांपासून नवी मुंबईतील दारावे गावात राहत होते.
यांनी बांगलादेश आणि भारत सीमेवरून घुसखोरी केली आहे. तसेच, ते विनापारपत्र नवी मुंबईत राहत होते. बांगलादेशातील नोडाईल जिल्ह्यातील जामवीर पडोली या गावातील हे तिघेही मूळ रहिवासी आहेत. पनवेल एस.टी. स्टॅन्ड परिसरात वावरत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना लवकरच कायदेशीर कार्यवाहीनंतर त्यांच्या मूळ गावी पाठविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.