महाडमधील तीन वाड्यांना स्मशानभूमीची प्रतीक्षा; आ.भरत गोगावले करतात तरी काय?
| महाड | सुजित धाडवे |
देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. ठिकठिकाणी स्मार्ट सिटी उभ्या रहात आहेत. शहरात यंत्राच्या एका बटनावर प्रेताला अग्नी दिला जातो. मात्र, महाडमधील वाड्यांना स्मशानभूमीच नसावी हे विषमवादी चित्र रायगड जिल्ह्यातील अप्पर तुडील ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या चांदणीकोंड, आंबेवाडी आणि अप्पर तुडील (कातळाचा कोंड) अशा तीन वाड्यांमध्ये दिसून येत आहे. पालकमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या आ. भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील ही दयनीय अवस्था असून, आमदार साहेबांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आपल्या मतदारसंघाकडेच दुर्लक्ष करणारे आ. गोगावले जिल्ह्याची जबाबदारी कशी सांभाळणार, अशी खोचक टीकाही स्थानिकांनी केली आहे.
महाडमधील तीन वाड्यांवरील ग्रामस्थांना स्मशानभूमी नसल्यामुळे पाताळगंगेच्या किनाऱ्यावरच अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पाताळगंगेच्या किनाऱ्यावर एका दगडावर लाकडे रचून अंत्यविधी केले जातात. विशेष म्हणजे स्मशानभूमी नाहीच पण येथे निवारा शेडदेखील उपलब्ध नाही. दरम्यान, स्मशानभूमी बांधून द्या, अशी मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत आहे.
माणसाच्या मृत्युंनतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हे स्मशानभूमीतच केले जातात. मात्र, महाड तालुक्यातील अप्पर तुडील, चांदणी कोंड व आंबेवाडी या तीन वाड्याना स्मशानभूमी नसल्याने गावाबाहेरील ठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागत आहे. अनेक वर्षापासून याठिकाणी हिच परिस्थिती आहे.
एखाद्याला जिवंतपणी कितीही कठीण प्रवास करावा लागला असला, तरी मृत्युनंतर त्याचा प्रवास सुरळीत व्हावा. मात्र, तुडील वासीयांच्या नशिबी मृत्यनंतरचा प्रवास काहीसा कठीण आणि खडतर असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, स्मशानभूमी नसल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल गावकऱ्यांनी तत्परतेने स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी केली. मात्र, आजपर्यंत तुडील भागातील तीन वाड्यांना स्मशानभूमीसाठी जागा मिळाली नाही. सध्या ज्या जागेचा वापर केला जात आहे. तिथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा अपुरी आहे. तसेच पाऊस आल्यास अनेक समस्यांना समोरे जावे लागते. अशा परिस्थितीत, ग्रामस्थांना योग्य आणि सुरक्षित स्मशानभूमीची नितांत गरज भासत आहे, जेणेकरून पार्थिवावर योग्य संस्कार आणि धार्मिक विधी पार पडू शकतील.
जागा निश्चित करण्याची गरज
नवीन स्मशानभूमी उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीवर कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. ग्रामस्थांनी या संदर्भात गाव ठरावात मागणी करण्यात आली असून, संबंधित विभागाने लवकरात लवकर योग्य जागा निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिकांना अपेक्षा आहे की, प्रशासन या मागणीकडे गांभीर्याने पाहील आणि लवकरच योग्य जागा निश्चित करेल. त्यामुळे धार्मिक विधी, अंत्यसंस्कार करणे सोपे होईल. स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या या मागणीकडे लक्ष देऊन योग्य तो निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. जेणेकरून गावातील सामाजिक व धार्मिक जीवन सुरळीत होईल, अशी येथील नागरिकांडून भावना व्यक्त करण्यात येत आहे.
पावसात अंत्यसंस्कार
पावसाळ्यात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीच्या शेडची सोय नसल्याने लोकांचे हाल होतात. शेड नसल्यामुळे मृतदेहांची अवहेलना होते आणि उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. स्मशानभूमी शेड व्यतिरिक्त संरक्षक भिंत, पाणी आणि बसण्याची जागा यांसारख्या मूलभूत सुविधांचाही अनेक ठिकाणी अभाव असतो.
जागा उपलब्ध करणे
स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्या कारणाने या तीन वाड्यांनी शेड उभारण्यासाठी प्रयत्न केले, परंतू खासगी जागेअभावी गेल्या अनेक पिढ्यावर, उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात, स्मशानभूमी शेडसाठी संघर्ष करत राहिले व अद्यापही हा लढा सुरूच आहे.






