। ठाणे । प्रतिनिधी ।
शहापूर तालुक्यातील आस्नोली येथे अन्नातून विषबाधा झाल्याने तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. काव्या (10), दिव्या (8) व गार्गी भेरे (5) अशी मृत मुलींची नावे असून त्यांना सोमवारी अन्नातून विषबाधा झाली होती. यापैकी दोघींवर नायर व एकीवर एसएमबीटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु, हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपात असावा असा संशय मुलींच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
शहापुरलगत असलेल्या चेरपोली येथील संदीप भेरे यांची पत्नी संध्या तीन मुलींसह गेल्या आठ महिन्यांपासून तालुक्यातील आस्नोली येथे तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी 21 जुलै रोजी काव्या, दिव्या व गार्गी या तिघींना पोटदुखी व उलट्यांचा त्रास होऊ लागला. मुलींच्या आईने त्यांना आस्नोली येथील खासगी डॉक्टर व नंतर शहापुर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिघींची प्रकृती चिंताजनक असल्याने मुंबईच्या नायर व घोटी येथील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान यामधील काव्या व गार्गीचा गुरुवारी तर दिव्याचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेमुळे तालुक्यात चर्चांना उधाण आले असून तर्कवितर्क केले जात आहेत. किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







