प्रवाशांच्या खिशावर तिहेरी भार; संतापाची लाट
| माणगाव | सलीम शेख |
कोकणाची जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अजूनही पूर्णत्वास गेलेले नसताना आता प्रवाशांवर तीन टोलनाक्यांचा भार टाकण्याची तयारी सुरू झाल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. अपूर्ण रस्ता, निकृष्ट दर्जाचे गावाकडचे मार्ग, अपुऱ्या सुविधा आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे आधीच त्रस्त असलेल्या वाहनचालकांना आता एका प्रवासात तीन वेळा टोल भरावा लागणार असल्याची माहिती समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या सुमारे 90 किलोमीटरच्या अंतरात खारपाडा आणि खांब या दोन ठिकाणी टोल नाके उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या दोन टोल नाक्यांमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना एका प्रवासात दोनदा टोल भरावा लागणार आहे. याशिवाय पुढील टप्प्यात पोलादपूरजवळील लोहारे येथेही टोलवसुली सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या ठिकाणी टोलनाका उभारण्यात आला असून, सिग्नल यंत्रणाही सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना भविष्यात तीन ठिकाणी टोल भरावा लागू शकतो. या घडामोडींमुळे “रस्ता पूर्ण नसताना टोल कशासाठी?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अपूर्ण रस्त्यावर टोल वसुलीचा निर्णय घेतल्यास तो कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरेल, अशी भावना सध्या सर्वत्र व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला असून, प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी कोकणवासीयांकडून करण्यात येत आहे.
16 वर्षांपासून रखडलेले काम
दरम्यान, या महामार्गाच्या कामाला आता तब्बल 16 वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण आणि रुंदीकरणाचे काम 2011 साली सुरू झाले. मात्र निधीअभावी, पर्यावरणीय परवानग्या, भूसंपादनातील अडचणी आणि काही ठेकेदारांच्या निष्क्रियतेमुळे हे काम वर्षानुवर्षे रखडत गेले. परिणामी, आजही या महामार्गाचे अनेक भाग अपूर्ण अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी अजूनही बांधकाम सुरू आहे. नागोठणे आणि कोलाड परिसरातील पुलांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच काही ठिकाणी अपूर्ण रस्ते, खड्डे आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत प्रशासनाने टोलवसुलीची तयारी सुरू केल्याने नागरिकांमध्ये असंतोष अधिकच वाढत आहे.
टोल किती असणार?
टोलचे दर किती असतील याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. टोलवसुली सुरू झाल्यानंतर वाहनधारकांच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गावाकडे जाणारे रस्ते निकृष्ट
दरम्यान, या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या दरम्यान अनेक गावांना जोडणारे रस्ते आहेत. मात्र, या गावांकडे जाणारे बहुतांश रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. काही ठिकाणी तर केवळ ब्लॉक टाकून तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरून प्रवास करताना गावकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
टोलवसुलीची घाई का?
महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोलवसुली सुरू करण्याची घाई प्रशासनाला का आहे, असा प्रश्नही आता नागरिक विचारू लागले आहेत. रस्त्यावर अजूनही खड्डे, अपूर्ण पूल, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा असताना प्रवाशांकडून टोल आकारणे कितपत योग्य आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे. या महामार्गाच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघात झाले असून, अनेक निरपराध नागरिकांचे बळी गेले आहेत. त्यामुळे रस्ता पूर्ण, सुरक्षित आणि दर्जेदार झाल्यानंतरच टोल आकारावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. तसेच महामार्गावर सुलभ शौचालये, स्ट्रीट लाईट, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग पॉईंट आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.







