मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोले बरसले!
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि. 29) विधानसभेत केली. यावरुन आता या सरकारला तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या सरकारला आपली जागा दाखवली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. काल अर्थसंकल्प सादर केला, घोषणा केल्या, पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर सरकारकडे नाही. घोषणांचे पालन पूर्णपणे शून्य आहे. सरकार आता खोटं बोलून नेरेटिव्ह सेट करत आहे, असेही ते म्हणाले.
वारकरी पंथाची लोक येऊन गेली. वारकरी प्रथेला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसे येईल, याचा प्रयत्न या सरकारने केला आहे. निरर्थक गवगवा सरकार करत आहे. शेतकर्यांचे कर्ज माफ केलं नाही. मुख्यमंत्री तीर्थयात्रा म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाची कढी, असं सगळं झालंय. या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार आहोत, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली आहे.