जिल्ह्यात फक्त 108 किलो लिटर रॉकेलचा साठा
| अलिबाग । प्रमोद जाधव ।
धुरामुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी रास्त दरात केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना सुरु केली आहे. घरोघरी गॅस कनेक्शन देण्यात आले. मात्र गॅस असलेल्या व्यक्तीला रॉकेल देणे बंद केल्याने त्याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड बसला आहे. विजेवर चालणारे दिवे असले तरीही आजही ग्रामीण भागात अनेक कामांसाठी रॉकेलची गरज निर्माण होत आहे. मात्र रॉकेलचा पुरवठा दुकानांमध्ये कमी झाल्याने नागरिकांना रॉकेलसाठी वणवण करावी लागत आहे.
रायगड ग्रामीण जिल्हा म्हणून ओळखला जातो. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या 26 लाख पेक्षा अधिक असून त्यात ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख पेक्षा अधिक आहे. ग्रामीण भागात गावांची संख्या दोन हजार पेक्षा अधिक आहे. पुर्वी स्वयंपाक करण्यासाठी चुलीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. घरातील विज पुरवठा खंडीत झाल्यावर रॉकेलवर चालणार्या दिव्यांचा अधार नेहमी घेतला जात होता. परंतू घराघरात विद्युत पुरवठा सुरळीत सुरु होण्यावर भर देण्यात आला.
मात्र चुलीवर स्वयंपाक करताना होणार्या धुरामुळे प्रदुषणाचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने उज्ज्वला गॅस योजना सुरु केली आहे. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकांसाठी ही योजना सुरु करून त्यांना सवलतीच्या दरात गॅस कनेक्शन देण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यात काही ठिकाणी वन विभागाने स्वतः पुढाकार घेत गॅस कनेक्शन देण्याचा प्रयत्न केला. चुलीवर होणार्या स्वयंपाकामुळे लाकडांची कत्तल मोठ्या प्रमाणात होते. पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका असल्याने चुलीवर स्वयंपाक करण्यापेक्षा सरकारने गॅसवर स्वयंपाक करण्यावर भर दिला. धुर प्रदुषण, जंगलातील लाकडांची कत्तल रोखण्यासाठी घरोघरी गॅस कनेक्शन देण्यात आले.
या योजनेचा नागरिकांनी सुरुवातीला जल्लोषात स्वागत केले. परंतू गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे आता गॅस नको रे बाबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गॅस ज्यांच्या घरात आहे त्यांना रॉकेल देणे शासनाने बंद केल्याने जिल्ह्यात रॉकेलचा पुरवठाही अल्प प्रमाणात करण्यात आला. जिल्ह्यामध्ये केरोसीमुक्त रायगड करण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. रॉकेलचा साठा आता जिल्ह्यासाठी कमी येऊ लागला आहे. सध्या जिल्ह्यातील दुकानांमध्ये 108 किलो लीटर रॉकेलचा साठा येत आहे. पुर्वी हाच साठा 300 किलो लिटर पेक्षा अधिक दिला जात होता. गॅस कनेक्शनमुळे रेशन शिधापत्रिकेतून रॉकेल देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रॉकेल मिळत नसल्याने या रॉकेलसाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
रॉकेल साठ्यावर दृष्टीक्षेप
पनवेल – 6 किलो लिटर
उरण – 6 किलो लिटर
खालापूर – 3 किलो लिटर
अलिबाग – 12 किलो लिटर
पेण – 1किलो लिटर
मुरुड – 7 किलो लिटर
माणगाव – 12 किलो लिटर
म्हसळा – 3 किलो लिटर
तळा – 3 किलो लिटर
रोहा – 12 किलो लिटर
महाड – 15 किलो लिटर
सुधागड – 12 किलो लिटर
महाड – 15 किलो लिटर
पोलादपूर – 15 किलो लिटर
रायगड जिल्हयामध्ये 108 किलो लिटर रॉकेलचा पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दुकानदारांकडे रॉकेल वितरीत केला जात आहे. जिल्ह्यात नऊ टँकरद्वारे रॉकेल वितरण केले जात आहे.
गोविंद वाकडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी