| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नगर पालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत व कंत्राटी कर्मचारी समन्वय समितीची सभा नुकतीच संघटना सदन, अलिबाग येथे जिल्हाध्यक्ष सुरेश पालकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. खातेनिहाय संघटनांच्या उपस्थित प्रतिनिधींनी आपापल्या खात्यातील समस्या पोटतिडकीने मांडून सहकारी कर्मचारी बांधवांना न्याय कसा मिळवून देता यावर विचारविनिमय केला. यावेळी, जिल्हाधिकारी यांना जिल्हा समन्वय समितीच्या वतीने विनंती पत्र देऊन खातेनिहाय समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित खात्यांच्या वरिष्ठांना बोलावून एक सभा आयोजित करण्यास सांगावे व जिल्हा पातळीवरच या समस्यांचे निराकरण होईल असा प्रयत्न करावा, असे सर्वानुमते ठरले.
राज्य पातळीवर छेडलेले बेमुदत आंदोलन स्थगित झाल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा जुन्या पेन्शन बाबत अजूनही कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारने न घेतल्यामुळे आंदोलनाची पुढील दिशा काय असावी, यावर चर्चा करतांना सर्व जिल्ह्यांच्या समन्वय समित्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, यामुळे भविष्यातील आंदोलन अधिक प्रभावीपणे होईल असे सर्वनुमते ठरले.
सन 2023 ते 2026 या कालावधीकरिता जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांची निवड पुढीलप्रमाणे एकमताने करण्यात आली. सुरेश पालकर- अध्यक्ष, प्रभाकर नाईक- निमंत्रक, संतोष पवार- सर चिटणीस, डॉ.कैलास चौलकर- कार्याध्यक्ष, संदीप नागे- कोषाध्यक्ष, सचिन जाधव, निलेश तुरे, मंगेश म्हात्रे- सर्व उपाध्यक्ष, सागर खंडेराव, राजेंद्र जाधव, रविंद्र वाघमारे- सह चिटणीस, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री गोविंद पाटील- ग्राम पंचायत विभाग, राजेंद्र म्हात्रे- जि.प.महासंघ, उमेश करमत- चतुर्थ श्रेणी कर्मचारी अनिल जाधव, राकेश पाटील- नगर पालिका, राजेंद्र म्हात्रे- ग्राम पंचायत कर्मचारी संघटना, राजेंद्र फुलावरे- प्रा.शिक्षक संघ, दिपक पाटील, संजय पोईलकर- शिक्षक भारती.
यावेळेस रा.जि.प.महासंघाच्या रायगड जिल्हा कार्याध्यक्ष पदी शैलेश नाईक, उपाध्यक्ष पदी संजय म्हात्रे, जिल्हा व्यवस्थापक- अंकुश शेळके यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी, ज्येष्ठ मार्गदर्शक परशुराम म्हात्रे, सुधीर खैरे उपस्थित होते. नवनिर्वाचितांचे स्वागत करतांना नूतन अध्यक्ष सुरेश पालकर यांनी भविष्यातील आंदोलनाला समर्थपणे सामोरेजाण्यासाठी तालुकानिहाय समन्वय समित्या सक्षम व अद्ययावत करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. संदीप नागे यांनी सर्वांचे आभार मानले.