सफाई न झाल्याने किल्ल्याचे दरवाजे अद्याप बंद; शिडाची बोटमालक उपासमारीची वेळ, 25 सप्टेंबरनंतर होणार खुला होण्याची शक्यता
| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुडचा जंजिरा किल्ला पावसाळ्याची 3 महिने समुद्र खवल्याने व वादळी वाऱ्यामुळे पर्यटकांसाठी 25 मेला बंद केला जातो. साधारण 1 ऑगस्टला मासेमारी बोटी सुरु होतात.तसेच जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत सुरु होणे अपेक्षित आहे. परंतु, पावसाने जंजिरा किल्ल्यात मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने किल्ला फिरणे पर्यटकांसाठी धोकादायक आहे. किल्ल्याची साफसफाई न झाल्यामुळे किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी अद्याप बंद आहेत. दरम्यान, किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत असून, त्यांना प्रतिक्षा कायम आहे. 25 सप्टेंबरनंतर किल्ला पर्यटनासाठी खुला होणार असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात येत आहे.
जर 15 ऑगस्टपर्यंत किल्ला पर्यटकांसाठी खुला करायचा असेल तर पुरातत्व खात्याने 15 दिवस अगोदर किल्ला सफाईचे काम सुरु करणे अपेक्षित आहे, परंतु तसे होत नाही. दरवर्षी निधी व कामाला मजूर मिळत नाही ही करणे देऊन पुरातव खात्याचे अधिकारी कामाला सुरवात करत नाही. पुरातत्व खात्याचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी याअगोदर 10 सप्टेंबरला किल्ला सुरु होईल असे सांगितले होते, पण आता तेच 25 सप्टेंबरपर्यत सुरु होईल, असे सांगत आहेत. त्यामुळे पर्यटक खूप नाराज आहेत. त्याचप्रमाणे शिडाच्या होड्यांचे मालक चार महिने काम नसल्याने त्यांची होणारी उपासमार बिकट असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
मुरुड जंजिरा येथील आर्थिक विकास पूर्णतः पर्यटनावर अवलंबून आहे ,त्यासाठी जंजिरा किल्ला हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे .जंजिरा किल्ल्याची समुद्राच्या लाटांनी अनेक बुरुजाला मोठी भगदाडे पडलीत. आता ह्या पावसात तलावासमोरील दरवाजा पडला आहे, त्याच्या दुरुस्तीची मागणी आम्ही नेहमीच करतो; परंतु गेली 15 वर्षात एकदाही किल्ल्याचे बुरुज दुरुस्तीला निधी आला नाही असे अधिकरी सांगतात. मग किल्ल्यात प्रवेश तिकीटमधून मिळणारे पैसे जातात कुठे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.