लागोपाठ सुट्यांमुळे सर्व पर्यटनस्थळांवर गर्दी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
परिक्षा संपल्यामुळे आणि जवळपास सर्वच शाळांना सुट्ट्या लागल्या असून लागोपाठ आलेल्या तीन सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने रायगडचे पर्यटन फुलले आहे. लॉकडाऊननंतर उठलेल्या निर्बंधांमुळे पर्यटनावर अवलंबून असलेले सर्व व्यवसायीकांच्या चेहर्यावर आता समाधान दिसत आहे.
पर्यटनावर अवलंबून असलेल्या रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. त्यात चक्रीवादळ, महापुर सारख्या नैसर्गिक संकटांमुळे रायगडचे कंबरडे चांगलेच मोडले होते. त्यामुळे रायगडचे अर्थचक्र चांगलेच थंडावले होते. मात्र हळूहळू निर्बंध कमी होत गेल्यानंतर पर्यटन व्यवसाय पुर्वपदावर येऊ लागला होता. मात्र तिसर्या लाटेने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर निर्बंध आले. त्यामुळे ऐन मौसमावेळी व्यवसाय ठप्प पडला. जानेवारी नंतर हळूहळू रुग्णसंख्या कमी होत गेली.
त्यामुळे पर्यटक पुन्हा समुद्रकिनार्यांकडे फिरकण्यास सुरुवात झाली असली, तरी त्याचा हवा तितका प्रतिसाद लाभत नसल्याने व्यवसायात गती लाभत नसल्याने चिंता कमी होत नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी होत गेल्यानंतर पुर्णपणे निर्बंध हटविले गेले. त्याचा लाभ पर्यटनावर देखील चांगला होऊ लागला. परंतु परिक्षांचा काळ आल्याने पुन्हा एकदा पर्यटकांची संख्या रोडावत गेली होेती. परिक्षा संपल्यानंतर पुन्हा एकदा आपला व्यवसाय पुर्वपदावर येईल या आशेवर व्यवसायीक होते. त्यानुसार लागोपाठ आलेल्या या महिन्यातील हा दुसरा आठवडा पर्यटनाच्या चांगलाच पथ्यावर पडला. त्यामुळे दोन वर्षे चेहर्यावर नाराजी असलेल्या व्यवसायीकांच्या चेहर्यावर पुन्हा एकदा हसू फुलण्यास सुरुवात झाली आहे.
मांडवा, किहीम, आवास, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवंदडा, कोर्लई, काशिद, नांदगाव, मुरुड, दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर अशा सर्वच समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची चांगली गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे रस्ते देखील वाहनांच्या गर्दीने फुललेले पहावयास मिळत आहेत.
पर्यटक येता जाता रस्त्यांवर असलेल्या कोकणातील मेवा खरेदीसाठी थांबून चांगली खरेदी करीत असल्याने या व्यवसायीकांचा देखील व्यवसाय बहरत असलेला पहावयास मिळत आहे. त्यात आंब्याचा मोसम असल्याने आंबा खरेदीसाठी देखील चांगली गर्दी होत आहे. त्याचबरोबर अलिबाग तालुक्यातील पांढर्यां कांद्यालाही चांगलीच पसंदी मिळताना पहायला मिळत आहे. कोकम, चिंच, पापड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, सुधागड परिसरात काजूचे ओले गर खरेदी करण्याासाठी देखील आवर्जून खवय्ये गर्दी करीत आहेत.