नाताळ, नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पसंती; समुद्रकिनारे गजबजले
| अलिबाग | गणेश चोडणेकर |
नाताळ आणि सरत्या वर्षाला निरोप, तसेच नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने रायगडातील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, थंड हवेचे ठिकाण माथेरानसह इतर पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजली आहेत.
नाताळ, सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात येत आहे. डिसेंबरचा अखेरचा आठवडा असल्याने सुट्ट्यांचा हंगाम आहे. अशात आता पर्यटकांची पावले रायगडमधील पर्यटनस्थळांकडे वळली आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणांवर पर्यटक आले आहेत. जिल्ह्यातील अलिबाग, आक्षी, नागाव, किहीम, काशिद, मुरूड, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन आणि माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या संख्येने पोहोचले आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी झाली आहे. किनारे गजबजून गेले आहेत. नाताळ 25 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत या पर्यटनस्थळांवरील हॉटेल्स हे आरक्षित असल्याचे येथील व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्याला पसंती
विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा, वनराई, गडकिल्ले, लेण्यांचे पर्यटकांना नेहमीच अप्रुप राहिले आहे. नाताळचा सण आणि लागून आलेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील विविध भागांतून पर्यटकांचा ओघ रायगड जिल्ह्यात वाढल्याचे दिसते.






