रस्त्यावर फलक व नकाशा नसल्याने पर्यटक हैराण
। दिघी । वार्ताहर ।
पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या श्रीवर्धनकडे येताना दिशादर्शक फलकांची मागणी जोर धरू लागली आहे. कारण मुंबई, पुण्याहून दिवेआगर पर्यटन स्थळाला भेट देताना म्हसळा बायपास मार्गावरुन चुकीचा प्रवास होत असल्याने वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटनाला जाताना दिघी-पुणे या महामार्गावरून 15 किलोमीटर अंतराचा प्रवास होत आहे. सध्या म्हसळा बायपास मार्गावरून श्रीवर्धन, दिवेआगर जाणार्या अनेक वाहनांना सोडण्यात येते. मात्र, या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्याने दिवेआगर जाणारा प्रवासी श्रीवर्धनमार्गे 34 किलोमीटरचा उलट प्रवास करत पोहोचत आहे. त्यामुळे दिवसा-रात्री वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरीदेखील संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत असल्याचे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
माणगाव, महाड, मुरुड, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील इतर महत्वाची पर्यटनस्थळे जोडणार्या रस्त्यांवर दिशादर्शक फलकच नाही, शिवाय असलेल्या दिशादर्शक फलकांची सध्या महामार्गाच्या कामात दयनीय अवस्था झालेली आहे. काही ठिकाणी फलक जमीनदोस्त झालेले आहेत. तर अनेक ठिकाणी या फलकांवर जाहिरातींचे फलक झळकत आहेत. त्यामुळे तालुक्यात येणार्या पर्यटकांची दिशाभूल होऊन पर्यटक व भाविक भरकटत असल्याचे पहावयास मिळत आहे.
पर्यटनाचा नकाशा असावा
पर्यटकांची दिशाभूल होऊ नये यासाठी अंतर्गत भागात तात्पुरत्या फलकांवर आजूबाजूला असलेल्या ठिकाणांची माहिती नकाशाच्या माध्यमातून दर्शवली जावी. किती किलोमीटरवर कुठले ठिकाण, तिथे कसे जाता येईल, असा संपूर्ण तपशील उपलब्ध व्हावा, अशी मागणी पर्यटक करत आहेत.
कोण सुविधा पुरवणार?
दिघी-पुणे महामार्गाचे काम महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ यांच्या अखत्यारीत होत आहे. त्यामुळे या मार्गावर मार्ग दाखविणारे फलक सार्वजनिक बांधकाम विभाग की महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ बसविणार असा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे.
मी पुणे येथून दिवेआगर पर्यटन स्थळी भेट देण्यास आलो. मात्र, ज्या मार्गावर उपरस्ते मिळतात, अशा मूळ ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने दिवेआगर पोहोचण्यासाठी मला जवळ-जवळ अर्धा तास चुकीचा प्रवास करण्यात वेळ गेला. आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.
- राजेंद्र बोधे, मुंबई
(छायाचित्र ः गणेश प्रभाळे)