मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोस्टल रोडचे लोकार्पण
| मुंबई |प्रतिनिधी |
मुंबईहून ठाणे, नवी मुंबई, कल्याण, भिवंडी, मीरा- भाईंदर, वसई-विरार आणि अलिबागपर्यंतच लोकल, बस किंवा खासगी वाहनाने जाण्यासाठी तीन चारतासांचा अवधी लागतो. मात्र आता हा प्रवास फक्त एक तासांवर येणार आहे. रिंग रूटच्या माध्यमातून हा प्रवास एका तासांत पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. सोमवारी (दि. 11) कोस्टल रोडचे लोकार्पण पार पडले त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांसह एमएमआरमधील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याच्या योजनांवर काम करत असल्याची घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की, मरीन ड्राइव्हहून कोस्टल रोडच्या माध्यमातून नंतर वांद्रे-वरळी सी लिंक, वर्सोवा-दहिसर कोस्टल रोड, दहिसर-मीरा भाईंदर एलिवेटेड कॉरिडोर, भाईंदर-विरार लिंक रोड, विरार-अलिबाग कॉरोडोरला अटल सेतू जोडला जाईल. यामुळं एमएमआरचा 222 किमीपेक्षा अधिक परिसर एकमेकांशी जोडला जाईल. दक्षिण मुंबईच्या एका टोकापासून ते उत्तर मुंबईचे शेवटचे टोक दहिसर, मीरा भाईंदरसह विरार-अलिबाग व तेथून अटल सेतूच्या माध्यमातून नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईला आरामात जोडले जाईल.