| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ वन विभागाच्या कार्यालयात असलेल्या झाडाने आज सकाळी अचानक पेट घेतला. वन कर्मचारी यांनी महावितरण कार्यालयाचे माध्यमातून वीज खंडित केली आणि त्यामुळे झाडाला लागलेली आग विझली. बुधवारी (दि.23) सकाळी आग लागली. विजेच्या तारांच्या खाली झाडाच्या फांद्या असल्याने सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगीचे लोळ दिसू लागले.
हिरवेगार झाडाने पेट घेतल्याने नेरळ खांडा मैदान भागातील परिसरात राहणारे लोक एकत्र जमा होऊ लागले. कार्यालयाच्या आवारात वनपाल एस.एस. म्हात्रे बाहेर आरडाओरड पाहून तात्काळ आपल्या कार्यालयातील सर्व कर्मचारी यांना एकत्र केले आणि महावितरण कंपनीला संपर्क केला. त्यावेळी महावितरण कंपनीने देखील तत्परता दाखवून नेरळ खांडा मैदान भागातील वीज खंडित केली. वीज खंडित होताच झाडाने घेतलेला पेट कमी होत गेला. अर्ध्या तासाने झाडाला लागलेले आगीचे लोळ देखील बंद झाले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आवारात मोठ मोठी झाडे असून त्या झाडांमध्ये विजेचे खांब देखील उभे आहेत. मे महिन्यात वीज वाहक तारा असून देखील त्या भागातील झाडांची छाटणी महावितरण यांच्याकडून केली गेली नव्हती. त्यामुळे हा प्रसंग निर्माण झाला होता, मात्र वीज खंडित केल्यानंतर आगीचे लोळ कमी कमी होत गेले आणि झाडाच्या शेंड्याला लागलेली आग विझली. आग विझल्या नंतर महावितरण कंपनी आणि वन कर्मचारी यांनी संपूर्ण झाड तोडण्यास सुरुवात केली. आणि तासाभराने संपुर्ण झाडाच्या सर्व फांद्या तोडण्यात सुहास म्हात्रे, ज्ञानेश्वर माऊली, भुषण सांळुखे, तुकाराम माली, धोंडु पांगारे, सुरेश ढुमणे, सचिन मेंगाळ हे यशस्वी झाले.