जल जीवन मिशनचे काम संथ गतीने सुरु असल्याचा फटका
| नेरळ | वार्ताहर |
कशेळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये स्थानिक महिलांनी एकत्र येत पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायती वर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 200 हून अधिक महिला पाण्याची समस्या घेऊन आल्या होत्या.
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामपंचायतीवर कशेळे गावातील महिला तसेच दोरेवाडीतील महिला यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभा घेण्यात आली. त्या ग्रामसभेत महिलांनी पाणी देण्याची मागणी केली. या ग्रामसभेला कशेळे ग्रामपंचायतीमधील एकही सदस्य उपस्थित नसल्याचे दिसून आले. कशेळे गावातील महिला आणि आदिवासी वाडीतील महिला पाण्याचा प्रश्न घेऊन आल्या होत्या. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे असंख्य महिलांच्या पदरी निराशा आली. आठ दिवसातून एकदा पाणी येते तर आम्हाला रोजचे पाणी पाहिजे असे प्रश्न उपस्थित करत ग्रामसभेत महिलांचा गदारोळ चालू होता. ग्रामसभेत कशेळे गावातील पाण्याविषय समस्यांचा प्रश्न उपस्थित केला पण ग्रामपंचायत सरपंच, ग्रामअधिकारी हात झटकत ठेकेदारांनाकडे बोट दाखवत ग्रामसभा आवरती घेतली.
कशेळे गावात आठ दिवसांनी एकदा पाणी येते. आमच्या गावात पाण्याची खुप टंचाई भासत आहे. पाणी आले तरी ते कधी पण येते. पाणी सोडण्याची निश्चित वेळ नाही. आठ दिवस पाणी मिळत नाही. आम्ही पाण्यासाठी कोणाकडे जायचे. आम्हाला दररोज पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायत आणि ठेकेदार यांनी काहीतरी उपाय योजना करावी.
सुषमा मते, ग्रामस्थ
कशेळे ग्रामपंचायतीसाठी 3.5 कोटीची रुपयाची जल जिवन मिशन योजना राबवली जात आहे. या योजनेचे काम पूर्ण करण्याचा कालावधी मे 2024 पर्यंत आहे. बहुतेक गावांना पाईपलाईन टाकून झाली आहे. कशेळे येथील सुद्धा पाईपलाईन टाकून झाली आहे. काही अडचणींमुळे काम संथगतीने सुरु आहे. रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पाईप फुटले आहेत. त्यामुळे कशेळे गावात पाणी येत नाही. पाईपची दुरुस्ती करून रोज पाणी देण्याचा प्रयत्न करु.
ठेकेदार







