वनजमिनींचा गेल्या दहा वर्षांपासून पेच कायम
। नवी मुंबई । वार्ताहर ।
शहरात परवडणार्या घरांचे मजले उभे राहत आहेत, मात्र येथील काही आदिवासी कुटुंबे आजही मोडकळीस आलेल्या झोपडीत वास्तव्य करीत आहेत. नवी मुंबई महापालिकेने घरकुल योजनेअंतर्गत बहुतांश जणांना हक्काचे पक्के छप्पर दिले आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे अनेक जण या योजनेतील सवलतींचा लाभ घेऊ शकलेले नाहीत.
नवी मुंबईत आठ विभाग असून प्रत्येक विभागात 3 ते 4 आदिवासी पाडे आहेत. एकूण 19 आदिवासी पाडे शहरात असून 3 हजार 73 इतकी लोकसंख्या आहे. यातील अनेकांना आजही पक्के घर मिळालेले नाही.
नवी मुंबई महापालिकेने या आदिवासींसाठी घरकुल योजना सुरू केली. यात 2005 मध्ये पावणे आदिवासी वारली पाड्यातील नागरिकांना वाल्मिकी आवास योजनेतून 75 कुटुंबाना घरकुल दिले तर 26 कुटुंबाना लाभ मिळालेला नाही. श्रमिक नगरमध्ये 172 घरकुले देण्यात आली आहेत. तर आता 14 वर्षांनंतर खैरणे कातकरी पाडा येथे 59 आदिवासी कुटुंबांना 59 घरकुले बांधून दिली आहेत. अडवली भुतावलीत 22 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र आजही काही ठिकाणी विखुरलेले आदिवासी निवार्यापासून वंचित आहेत. पक्के घर तर नाहीच शिवाय पाणी, शौचालय, शिक्षण या सुविधांचा देखील अभाव आहे.