| उरण | प्रतिनिधी |
जासई-दास्तान फाटा येथे 1984 साली शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी झालेल्या व देशभरात गाजलेल्या आंदोलनात पाच शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मात्र, त्यानंतर 40 वर्षांचा काळावधी लोटल्यानंतरही शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे शेतकरी, प्रकल्पग्रस्त, भुमीपुत्रांचे पुनर्वसन, रोजगाराचे प्रश्न मार्गी लावणे तसेच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव लावणे हीच आंदोलनातील हुतात्मे आणि दिवंगत नेते माजी खासदार दि.बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे असे प्रतिपादन हुतात्म्यांच्या विचारांनी प्रेरित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त करत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
नवी मुंबई वसविण्यासाठी सिडकोने कवडीमोल भावाने जमिनी संपादित करण्यासाठी सुरुवात केली होती. संपादन जमिनीला विरोध करताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी जानेवारी 1984 साली शेतकऱ्यांचे आंदोलन झाले. दिबांच्या मार्गदर्शनाखाली दास्तान व नवघर येथे हजारोंच्या संख्येने जमलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात नामदेव शंकर घरत (चिर्ले), रघुनाथ अर्जुन ठाकूर (धुतुम), कमलाकर कृष्णा तांडेल तसेच महादेव हिरा पाटील व केशव महादेव पाटील ( पागोटे) यांनी बलिदान दिले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हुतात्म पत्करलेल्या पाचही हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी रोजी जासईत तर 17 जानेवारी रोजी पागोटे येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी जासई येथील हुतात्मा स्मारकात सर्वपक्षीय अभिवादन सोहळा पार पडला. या सोहळ्याप्रसंगी नगराध्यक्षा भावना घाणेकर, महेंद्र घरत, भूषण पाटील, दिनेश पाटील, रवींद्र पाटील, अतुल पाटील, अविनाश कोळी, संतोष घरत, नरेश घरत, जितेंद्र म्हात्रे, सुचिता ठाकूर, चंद्रकांत घरत, सीमा घरत, बळी घरत, गोपिचंद्र पाटील आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.






