दहा जण गंभीर जखमी
। पुणे । वृत्तसंस्था ।
पुण्यातील नगर-कल्याण महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक भरधाव ट्रक अंत्यविधीवरुन परतणाऱ्या लोकांमध्ये घुसल्याने ट्रकच्या धडकेत पाच जण ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी येथे शुक्रवारी (दि. 19) सकाळी 11.30 च्या सुमारास ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. गावातील एका व्यक्तीचा अंत्यविधी करून गावातील अनेक नागरीक आणि नातेवाईक घरी माघारी परतत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रक या गर्दीत घुसला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडून पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. तसेच, सुमारे दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा अधिक तपास करत आहेत. तसेच, या घटनेने नागरिकांमध्ये शोक आणि संताप व्यक्त होत आहे.