| नेरळ | वार्ताहर |
नेरळ येथे सरकारी निधी लाटण्याचा प्रयत्न सुरु आहे. एका विकसकाने तोडलेली भिंत सरकारी पैशातून बांधण्याचा घाट घातला जात असल्याची जोरदार चर्चा आहे. जुन्या भिंतीच्या कामासाठी नवीन बांधकाम करण्याचा प्रकार होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदरचे काम किती खर्चाचे आहे याबद्दल ग्रामपंचायत देखील अभिज्ञ आहे.
नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खेळाचे मैदान आहे. या मैदानाचा वापर एका विकसकाने आपले बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला होता. त्यानंतर बांधकाम साहित्य नेण्यासाठी मैदानाची जुनी संरक्षक भिंत तोडून टाकली आणि आपले काम पूर्ण झाल्यावर भिंत बांधून देण्याचे नेरळ ग्रामपंचायतीला लेखी कळविले होते. मात्र, तीन वर्षात त्या ठिकाणी नवीन भिंत बांधण्याचे कोणतेही काम झाले नाही. आता त्याच मैदानाची संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे त्या विकसकाने दिलेल्या पत्राचे काय झाले तसेच मैदानाची नासधूस झालेली असताना संबंधिताकडून कोणत्याही प्रकारची भरपाई नेरळ ग्रामपंचायतीने का घेतली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास निधीमधून छत्रपती शिवाजी महाराज मैदानात संरक्षण भिंत आणि अन्य सुशोभीकरणाची कामे केली जाणार आहेत. मात्र, सध्या जुन्या भिंतीचे प्लास्टर काढून त्यावर नवीन दोन थर बांधकाम करून जुन्या भिंतीला नवीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. निधी लाटण्याच्या उद्देशाने जुन्या कामाला नवीन रूप देण्याचे प्रयत्न सुरु असून तेथे शासनाकडून मंजूर केलेले काम नियमानुसार व्हायला हवे, रस्त्याकडेही नेरळ ग्रामपंचायतीने लक्ष केंद्रित करायला हवे, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.
सद्यस्थितीत या मैदानावर अपवाद वगळता सर्व भागात चांगल्या स्थितीत असलेली दगडी भिंत आहे. 2014 मध्ये बांधण्यात आलेल्या भिंतीचे काम चांगल्या दर्जाचे असल्याने छत्रपती शिवाजी महाराज मैदान आजही सुरक्षित आहे. असे असताना कोट्यवधींचा निधी मैदानाची भिंत बांधण्यासाठी कशासाठी पाहीजे, निधी लाटण्यासाठी अशी कामे मंजूर करून घेण्यात आली आहेत काय?, राज्य सरकारच्या प्रादेशिक पर्यटन विकासमधून मैदानाच्या संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर केला आहे काय? असे अनेक प्रश्न नेरळ ग्रामस्थ विचारत आहेत.
आमच्याकडे मैदांनाच्या कामाबद्दल तक्रारी येत आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्या कामाचे अंदाजपत्रक मागत आहोत. संबंधित विभागकडून अंदाजपत्रक आल्यानंतर नक्की कोणती कामे त्या निधीमधून केली जाणार आहेत. याची माहिती ग्रामपंचायतीकडे असणार आहे. त्यानंतर ती कामे अंदाजपत्रकानुसार होतात किंवा नाही याची पाहणी ग्रामपंचायत करणार आहे.
अरुण कारले
ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत