। मुंबई । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याला आम्ही उत्तर देणार नाही. त्यांच्या वक्तव्यांवर उत्तर द्यायचं की नाही याबाबत एकनाथ शिंदे हे निर्णय घेतील. त्यांनी सांगितल्यानंतरच उत्तर देऊ. उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच आदर आहे. नाती जपण्यात जी गोडी आहे ती राजकारणात नाही, असं शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. गोव्यात त्यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. केसरकर पुढे म्हणाले की, आम्ही कोणतंही सेलिब्रेशन करणार नाहीत. विधानसभेत बहुमत मिळाल्यानंतरही आम्ही सेलिब्रेशन करणार नाहीत, असं केसरकर म्हणाले. आमचे उद्धव ठाकरे नेते आहेत. त्यांच्यासोबत भावना जोडलेल्या आहेत. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेस जवळचे वाटत असतील तर हा भ्रम कधीतरी दूर होईल, असंही केसरकर म्हणाले.
आमचा लढा महाराष्ट्राच्या विकासासाठी असणार आहे. फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये येण्यानं मजबुती मिळाली आहे. भाजप आणि शिवसेनेची मनं जुळणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे आता राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत, त्यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास नक्की करु, आत्महत्या मुक्त महाराष्ट्रचा संकल्प आम्ही घेतलाय, असंही ते म्हणाले.
शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेवर बोलताना केसरकर म्हणाले की, 20 रुपयांचा वडापाव खाणाऱ्यांना 100 रुपयांचं प्रतिज्ञापत्र का? पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नव्हे तर प्रेमाचं बंधन हवं, शिवबंधन हेच प्रेमाचं बंधन आहे, असं केसरकर म्हणाले. आम्ही शिवबंधन आज सुद्धा घालतो. शिवबंधन बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून घालतो. आम्ही खरे सैनिक आहोत. आम्ही सर्व कार्यकर्त्याना सांगू इच्छितो असे अॅफिडेबिट केल्यानंतर काहीही होत नाही, असंही केसरकरांनी सांगितलं.