तीन गावांचा संपर्क तुटला
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील वावे, बेंडसे आणि बार्डी गावाला पुराच्या पाण्याने घेराव घातला आहे. तर, त्या तिन्ही गावातील अनेक ग्रामस्थांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने स्थानिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
खंडाळा घाटात उगम पावणाऱ्या उल्हास नदीला शनिवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे महापूर आला आहे. या पाण्यामुळे उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. रात्रीच्या वेळी उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या बेंडसे, वावे आणि बार्डी गावाच्या सभोवताली पावसामुळे आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाल आहे. अचानक पावसाच्या पाण्याने या तिन्ही गावांना वेढा घातल्याने तिन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. वावे गावाच्या बाहेर असलेली जिल्हा परिषद शाळा इमारत तर तब्बल अर्धी पाण्याखाली बुडाली होती. त्याचवेळी तेथील नळपाणी योजनेचे उद्भव विहीर देखील पाण्याखाली गेली असून पलीकडे असलेल्या बेडसे गावातील अनेक घरांमध्ये महापुराची पाणी गेले आहे.
तालुक्यातील या तिन्ही गावातील ग्रामस्थ रात्रभर जागे होते आणि त्यात रविवारी सकाळी पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर या गावांचा संपर्क तुटल्याने नातेवाईकांना देखील एकमेकांची मदत करता आली नाही. तसेच, उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या रिसॉर्ट्समध्ये पाणी शिरल्यान येथे असलेल्या पर्यटकांना अन्यत्र हलविण्याची वेळ आली होती. शनिवारपासून सुरु असलेल्या पावसामुळे उल्हास नादीच्या पाण्याची पातळी 45 मीटरहुन अधिक गेल्याने तीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे अनेक गावांना सतर्क राहण्याचे इशारे महसूल विभागाकडून तसेच तहसील कार्यालयातून देण्यात येत होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा देखील जागोजागी तैनात होती.