। पेण । वार्ताहर ।
पेणकरांची जिवनवाहीनी समजली जाणारी भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात अनाधिकृतरित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. या बांधकामाकडे ना महसुल खात्याच लक्ष ना जलसंपदा खात्याच लक्ष. त्यामुळे भोगावती नदी संवर्धनप्रेमी संतप्त झाले आहेत. भोगावती नदीच्या भुंड्या पुलापासून ते हेटवणा धरणाच्या पायथ्यापर्यंत भोगावती नदीच्या पायथ्याचा विचार केल्यास नदी पात्रात अनाधिकृतरित्या बांधकाम करणार्यांची संख्या शतक पार होईल. पंरतु या बाबीकडे प्रशासन का दुलर्क्ष करतेय हे समजत नाही. भुंड्या पुलाच्या शेजारी तरणखोप स्मशानभुमी पर्यंत भले मोठे भोगावती नदीच पात्र होत. परंतु, आज या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात भर टाकून पात्राची रुंदी कमी करण्यात आलेली आहे. असे असताना ही बाब महसुल खात्याच्या तलाठ्यांना अथवा मंडळ अधिकार्यांना कशी दिसत नाही हीच मोठी संशोधनाची बाब आहे. नदी पात्र अरुंद झाल्यास भविष्यात पुराचे पाणी नदीपात्र सोडून इतरत्र आपला मार्ग निवडेल आणि मोठ्या प्रमाणात याचा धोका जनजिवन विस्कळीत होणार आहे. तरी प्रशासनाने या अनाधिकृत बांधकाम करणार्यांवर कारवाईचा बडगा उचलावा अन्यथा भविष्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास विचार करण्यापलिकडे काहीच हातात राहणार नाही. वेळेस खबरदारी म्हणून पंचनामे करून संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी भोगावती संवर्धनप्रेमी करत आहेत.