बौद्ध समाजाची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात कृषी संशोधन केंद्राच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभे राहत आहे. त्या परिसराच्या आजुबाजुस असलेल्या टपऱ्या तसेच अनधिकृत फेरीवाले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्यावर कारवाई करून त्या ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र म्हणून फलक लावण्यात यावा, या मागणीसाठी कर्जत तालुक्यातील समस्त बौद्ध समाजाच्यावतीने कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
15 वर्षाच्या बौद्ध समाजाच्या संघर्षानंतर या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाची निर्मिती होत आहे. या वास्तुच्या आजुबाजुला अनधिकृत फेरीवाले, टपऱ्या बांधणे, भराव टाकणे अशी कामे केली जात असून या परिसरात रात्रीच्या सुमारास दारु पिऊन धिंगाणा करणे अशी कृत्ये होत आहेत. तरी हे अनधिकृत धंदे व टपऱ्या त्वरीत बंद करून त्यांना तेथून हटविण्याची कारवाई त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तसेच उप नगराध्यक्ष संतोष पाटील यांनी ही निवेदन स्वीकारले आहे. नगरपरिषद हद्दीत असलेल्या इतर स्मारकांच्या बाजुला कोणतेही धंदे अथवा टपऱ्या नाहीत, त्याचप्रमाणे हा परिसर देखील स्वच्छ व मोकळा करण्यात यावा. नगरपरिषदेच्या माध्यमातून तसा फलक लावण्यात यावा, अशी मागणी बौद्ध धर्मीय यांच्यावतीने करण्यात आली आहे.







