भारताचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
सर्वाधिक पाच वेळा विजेते ठरलेल्या भारताच्या युवा क्रिकेट संघाने शुक्रवारी (दि. 2) 19 वर्षांखालील विश्वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली. कर्णधार उदय सहारन (100 धावा) व सचिन धस (116 धावा) यांची दमदार शतकी खेळी व एस. पांडेसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने नेपाळच्या युवा संघावर 132 धावांनी दणदणीत विजय साकारला आणि अंतिम चारमध्ये पाऊल ठेवले. सचिन धस याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
ग्रुप 2 मधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर सुपर सिक्सच्या ग्रुप 1 मध्ये भारतीय संघ अव्वल स्थानावर राहणार हे देखील निश्चित आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत भारतीय संघचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. या स्पर्धेचे दोन उपांत्य फेरीचे सामने 6 आणि 8 फेब्रुवारी रोजी खेळले जाणार आहेत. पहिला उपांत्य सामना गट 1 मधील अव्वल संघ आणि गट 2 मधील द्वितीय क्रमांकाचा संघ यांच्यात होईल. म्हणजेच पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ 6 फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामनाही याच मैदानावर 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे