जवळपास तीनशे युवक-युवती व विद्यार्थी स्पर्धेमध्ये सहभागी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “घरोघरी तिरंगा” अभियानाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा परिषद, रायगड, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड, नेहरु युवा केंद्र, रायगड, प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग व रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने मिनी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी ७ वाजता या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
या स्पर्धेमध्ये जवळपास तीनशे युवक-युवती व विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेची समाप्ती शहीद निलेश तुणतुणे यांच्या सहाणगोठी येथील स्मारक येथे करण्यात आली. समारोप प्रसंगी शहीद निलेश तुणतुणे यांचे वडील नारायण तुणतुणे, निर्मला तुणतुणे, भाऊ शैलेश तुणतणे, ती तुणतुणे व इतर कुटुंबियांचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तिरंगा झेंडा देवून सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- मुलांचा गट प्रथम – संदिप पाल, व्दितीय–राजेश तांबोळी, तृतीय– रामु पारधी , चौथा- धिरज पाटील, पाचवा- सौरभ गोटुरे तर मुलींच्या गटामध्ये प्रथम -कथा वाडकर, व्दितीय – अमृता शेडगे, तृतीय –भुमी म्हात्रे, चौथी-सेजल घरत, पाचवी- कुंजल नाईक या खेळाडूंनी प्रावीण्य प्राप्त केले. या स्पर्धेमध्ये प्रियांशी भोईर या आठ वर्षाच्या खेळाडूने सहभाग घेवून स्पर्धा पूर्ण केली. या खेळाडूस आणि या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना शहीद निलेश तुणतुणे यांच्या कुटुंबियांच्या हस्ते बक्षीस, प्रमाणपत्र व तिरंगा ध्वज देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी रायगड जिल्हा पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेच्या वतीने वाहतुकीचे व्यवस्थित नियमन करण्यात आल्याने वाहतुकीस कोणताही अडथळा न येता स्पर्धा सुरळीत पार पडल्या.
स्पर्धेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून रुग्णवाहिका व वैद्यकीय प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. स्पर्धेच्या तांत्रिक बाबींसाठी रायगड जिल्हा ॲथलेटीक असोसिएशनचे पंच व पायलट यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. पंचांमध्ये यतिराज पाटील, अभिषेक पाटील, शिवम ठोंबरे, अमर तुणतुणे, अक्षय राणे, आशुतोष शिर्के, मंदार सीणकर, समीर माळी, तेजेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या आयेाजनासाठी संदिप वांजळे, सचिन निकम, सुचिता साळवी, सुरेंद्र कांबळे, प्रफुल पाटील, विनय राऊत इत्यादींनी काम पाहिले.
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, विद्यार्थी व तरुणांनी घरोघरी तिरंगा या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्यावा. अशा उपक्रमांमधून शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी युवक-युवती तसेच नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना वाढीस लागते. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्पर्धेबाबतही मार्गदर्शन केले.
यावेळी नेहरु युवा केंद्राचे समन्वयक निशांत रौतेला, केंद्रीय माहिती व प्रसार संचालनालयाचे फनीकुमार, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या श्तपस्वी गोंधळी, निवृत्त कॅप्टन उमेश वाणी, कांबळे, मेश्राम इत्यादी उपस्थित होते