। रसायनी । वार्ताहर ।
रसायनीतील वासांबे-मोहोपाडा परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. महावितरणकडून एका ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जात असताना, खबरदारी म्हणून इतर ठिकाणचा पुरवठाही बंद केला जातो. त्यामुळे परिसरात सतत विजेचा खेळखंडोबा सुरू असतो. गणेशोत्सवात ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा, यासाठी वासांबे-मोहोपाडा वीज महावितरणने मुख्य वीज वाहिन्याच्या मार्गावरील तीन जीओडी बदली आणि तीन जीओडीचे दुरुस्ती काम हाती घेतले आहे. त्यामुळे यापुढे दुरुस्तीचे काम करताना इतर ठिकाणाचा वीज पुरवठा सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
जिल्ह्यात वासांबे-मोहोपाडा येथील सहायक अभियंता कार्यालयाअंतर्गत वीज ग्राहकांची संख्या सर्वात जास्त आहे. येथील दांड-पेण मार्गालगत मुख्य वीज वाहिनीवर नादुरुस्त जीओडीची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असल्याने महावितरणकडून सांगण्यात आले.
वीज वाहिन्या फांद्यांच्या संपर्कात येणे, पक्ष्यांमुळेही तांत्रिक बिघाड होत असल्याने बर्याचदा वीज पुरवठा खंडित होतो. असे प्रकार परिसरात दिसल्यास नागरिकांनी महावितरण कार्यालयात कळवावे.
– किशोर पाटील, सहायक अभियंता