प्रवासी हैराण- नागरिक हैराण
| चिरनेर । वार्ताहर |
उरण तालुक्यात बेशिस्त वाहतुकीमुळे हजारो निष्पाप तरुणांचे अपघातात प्राण गेले असून, अनेक वर्तमानपत्रात याबाबत वस्तुस्थिती मांडण्यात आली. त्यामुळे रस्ते रुंद झाले मात्र वाहतूक कोंडी काही कमी झाली नाही. वाहतूक पोलीस प्रशासन देखील या बेसिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत नसल्यामुळे आणि स्थानिक पुढार्यांचा आर्थिक वरदहस्त असल्यामुळे यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता दिसत नाही.
तालुक्यात वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहन चालकाकडून मागील वर्षी 2022 या आर्थिक वर्षात एक कोटी चार लाख 29 हजार पाचशे रुपये एवढा प्रचंड दंड वसूल केला आहे. यावरून तालुक्यात बेशिस्त वाहतुकीचे मोठे प्रमाण दिसून येते. सन 2023 मध्ये मोटर वाहन कायद्या अंर्तगत 2723 कारवाई करण्यात आलेली असून, त्यांच्यावर एकूण दंडाची रक्कम 31 लाख तीन हाजार 500 एवढ्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तसेच मोटर वाहन कायदा कलम 129 /177 अन्वये 459 कारवाई करण्यात आले असून, त्यावरील दंडाची रक्कम 22 लाख 9 हजार 500 एवढ्या रकमेचे दंडात्मक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी दिली. या दंडात्मक कारवाईने शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. उरण तालुक्यातील जेएनपीटी ,बेलापूर ,जेएनपीटी, पळसपे या महामार्गाचे सहापदरीकरण झाले आहे.
या मार्ग लगत सार्वजनिक वाहतुकीसाठी सर्विस रोड बनविण्यात आले आहेत. मात्र हे सर्विस रोड अवजड वाहनांचे पार्किंग ठिकाण झाले असून, सार्वजनिक वाहतुकीला या सर्विस मार्गावर जागा शिल्लक ठेवलेली नसते. तसेच चिर्ले, दिघोडे, गव्हाणफाटा दिघोडे या रस्त्यांवर अवजड वाहने दोन्ही बाजूला उभी केले जात असल्याने येथे देखील नेहमी वाहतूक कोंडी होत असते.