विजेच्या लपंडावामुळे उरणकर त्रस्त

शासकीय कार्यालये, बँका आदींच्या कामकाजावर परिणाम
| उरण । वार्ताहर ।

उरण शहर तसेच अनेक गावांतील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून, विजेच्या या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. बोकडविरा गावात मंगळवारी रात्री खंडित झालेली वीज बुधवारी सकाळी नऊ वाजता आली. यामुळे शासकीय कार्यालये तसेच बँकांच्या कामकाजावरही परिणाम होऊ लागला आहे. तर, दुसरीकडे उद्योजकही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सुरुवातीच्या पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना ही नित्याची बाब असली तरी पावसाळा सुरू होऊन दोन महिने लोटल्यानंतरही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवारी शहरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने येथील तहसील, पोलीस ठाणे, बँका, झेरॉक्स दुकाने येथील कामकाजावर परिणाम झाला होता. त्यामुळे कार्यालयातील कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. तर, बोकडविरा गावातील वीज रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास खंडित होऊन बुधवारी सकाळपर्यंत आली नव्हती. त्याचप्रमाणे उरणच्या पूर्व विभागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक तास नागरिकांना विजेअभावी रात्र काढावी लागत असल्याची माहिती चिरनेरमधील सामाजिक कार्यकर्ते जीवन केणी यांनी दिली.

पावसामुळे अनेकदा झंपर उडण्याच्या तसेच इतर कारणानेही वीजपुरवठा खंडित होत असला तरी तो तातडीने पूर्ववत करण्यात येत आहे.

– विजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, उरण महावितरण



Exit mobile version