। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील हिरेवाड़ी येथील विहिरीचा वापर येथील स्थानिक बांधकाम व्यवसायिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी वापरत आहे. विहिरीमध्ये चक्क मोटार टाकून पाणी उपसा सुरू असून या पाणी उपशामुळे स्थानिक ग्रामस्थ यांना पाणीटंचाईल सामोरे जावे लागत आहे.
जामरुंग ग्रामपंचायत हद्दीतील हिरेवाडी या आदिवासीवाडीमध्ये 40 घराची लोकवस्ती असून वाडीतील आदिवासी यांच्यासाठी नदीच्या बाजूला विहिरी खोदण्यात आली आहे. सरकारी खर्चातून बांधण्यात आलेल्या त्या विहिरीचे पाणी गेल्या स्थानिक यांना पिण्याच्या वापरासाठी वापरले जाते. मात्र सर्वत्र पाणीटंचाई असताना विहिरीचे पाणी हिरेवाडी गावाच्या बाजूला असलेली बांधकाम ठेकेदार वापरत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या त्या विहिरीत तब्बल तीन विजेच्या मोटार टाकून पाणी उपसा केला जात आहे. त्याचा परिणाम हिरेवाडी ग्रामस्थ यांच्यासाठी बांधलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरीचे पिण्याचे पाणी कमी झाले असून या वाडीतील ग्रामस्थ चिंतेत आहेत. विहीरीच्या पाण्याचा उपसा वारंवार केल्याने हिरेवाडी गावाला पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावामध्ये पाण्याची टंचाई जाणवत असून गावकर्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
सदर बाब हीरेवाडी ग्रामस्थांनी जामरुंग ग्रामपंचायत यांना लेखी अर्ज देवून वारंवार कळवली. मात्र त्याकडे ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक लक्ष देत नाहीत.त्यामुले ग्रामस्थांनी कर्जत तालुक्याचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना भेटून निवेदन दिले आहे. परिणामी आदिवासी लोकांच्या हक्काचे पाणी बांधकाम व्यवसायिक याने पळवून नेले आहे.याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य विचार करून विहिरीच्या पाण्याचा वापर अन्य कोणालाही खासगी कामासाठी करून देऊ नये अशी मागणी केली आहे.कर्जत तालुक्यात पाणीटंचाई सुरू असून तालुक्यात पाणीटंचाई निवारण्यासाठी शासनाने ट्रँकर सुरू केले आहेत.मात्र हिरेवाडी मध्ये कुत्रिम् पाणीटंचाई निर्माण झाली असून त्याबद्दल तहसीलदार कोणती भूमिका घेतात याबदल आदिवासी लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
.
हिरेवाडीमधील विहिरीची तहसीलदार यांनी तत्काळ पाहणी करावी आणि संबंधित बांधकाम व्यवसायिक यांची जलवाहिनी तेथून काढून टाकावी. त्याचवेळी कारवाई करून आम्हला न्याय द्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू
भरत शिद
अध्यक्ष कर्जत तालुका आदिवासी संघटनाvv