सुखदुःखाच्या गोष्टींची देवाणघेवाण
| सुधागड-पाली | वार्ताहर |
भारतीय खाद्य संस्कृतीत विविध लज्जतदार पदार्थांना विशेष महत्व आहे. त्यातच पावसाळ्यातील बेगमीसाठी उन्हाळ्यात करण्यात येणाऱ्या असंख्य पदार्थ यांची जंत्रीच आहे. उन्हाळ्यात बहुतांश घरात पापड, कुरडया, चिकोड्या, शेवया, फेण्या, सांडगे, लोणची व मसाले या विविध पदार्थांसह वाळवणाचे पदार्थ सामुहिक व वैयक्तीकपणे तयार केले जातात. जिल्ह्यात सध्या हे पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. गावागावात महिला एकत्र येऊन एकमेकींना या कामासाठी मदत करतात. यातून एकमेकांच्या सुखदुःखाच्या गोष्टी सुद्धा होतात.
जिल्ह्यात आजही अनेक घरांमध्ये हि वाळवण संस्कृती जोपासली जात आहे. पापड, कुरडया, लोणचे, चिकोड्या, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, मसाले, सांडगी मिरची विविध सरबत आदि पदार्थ तयार करण्यासाठी तर गावागावतील महिला गोळा होतात. प्रत्येक महिला आपल्या शेजारणीकडे व इतर घरी हे सर्व पदार्थ बनविण्यासाठी विनाशुल्क आनंदाने जाते. मग हे पदार्थ बनवितांना कधी गप्पा रंगतात, तर कधी गाणी गुणगुणली जातात. घरातील बच्चे कंपनी देखील त्यांच्या मदतीला सज्ज असतात. तयार पापड, कुरडया, मिरगुंड, फणस व आंबा पोळी, सांडगी मिरची, लोणची, मसाले असे पदार्थ नातेवाईक, शेजाऱ्यांना चवीसाठी दिले जातात. हि परंपरा व संस्कृती अजुनही टिकून आहे. याबरोबरच अनेक घरांच्या अंगणात, पडवीत, छतावर, कौलावर किंवा पत्र्यावर कापलेल्या आंब्याच्या फोडी ठेवल्या जातात. त्याचबरोबर सुकी मच्छी तसेच कोकम सरबत बनविण्यासाठी बाटल्यांमध्ये कोकम ठेवले जाते अशी हि पावसाळ्याची बेगमी व वाळवण संस्कृती अखंडीतपणे सुरु आहे.
कडधान्य खरेदीची लगबग
पावसाळ्यात कडधान्य अनेकांची हक्काची बेगमी असते. सध्या अनेक जणांची कडधान्य खरेदी व साठवण करण्यासाठी लगबग सुरु आहे. खराब हवामान, अवकाळीमुळे यंदा जिल्ह्यात कडधान्य पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.जिल्ह्यात जवळपास चार हजार 381 हेक्टरवर वालाची लागवड केली जातेच. त्यानंतर मुग, मटकी, चवळी, तूर आदी कडधान्याची लागवड केली जाते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी अनेक जण घरात कडधान्य साठवून ठेवतात. बाजारात ग्राहक कडधान्य खरेदीसाठी येत आहेत. गावठी कडधान्यांना अधिक मागणी असते. अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात घट झाल्याने किंमती वाढल्या आहेत.
भद्रेश शहा, कडधान्य विक्रेते, पाली
गावातील महिला एकत्र येऊन प्रत्येकीकडे पापड, कुरडया, चिकोड्या आदी पदार्थ बनविण्यासाठी जातो. यातून खूप चांगला संवाद साधला जातो. गप्पांची मैफल रंगते. एकमेकींना मदत होते, शिवाय काम देखील लवकर होते. ज्या घरात जाऊ तिकडे कधी भेळ, वडे, पोहे आदी पदार्थ सर्व मिळून खातो. ही एक वेगळीच मजा आहे. शिवाय घरातील लहान मुले देखील यावेळी मदत करतात. दरवर्षी पावसाळ्याच्या आधी गावठी कडधान्य विकत घेते.
प्रियांका गोसावी, गृहिणी, पाली