अटकपूर्व जामीनही फेटाळला; महाड हिंसाचार प्रकरण चिघळलं
| महाड | प्रतिनिधी |
महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात विकास गोगावले यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मतदानाच्या दिवशी घडलेल्या हिंसाचारामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही दोन वेगवेगळ्या न्यायालयांनी विकास गोगावले यांना दिलासा देण्यास नकार दिला होता.
महाड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 2 मध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान शिंदे गटाचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या मारहाणीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप विकास गोगावले आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेनंतर महाड पोलिस ठाण्यात विकास गोगावले यांच्यासह एकूण 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी भूमीगत झाले आणि आजपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
या प्रकरणात विकास गोगावले यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. माणगाव न्यायालयात त्यांनी दोन वेळा अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला, मात्र दोन्ही वेळा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी मुंबई न्यायालयातही धाव घेतली, परंतु तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सलग तिसऱ्यांदा जामीन नाकारण्यात आल्याने विकास गोगावले यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. गेल्या 24 दिवसांपासून ते फरार असल्याची माहिती असून, पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू आहे. याच प्रकरणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाना जगताप हेदेखील अद्याप फरार असल्याचं समोर आलं आहे.
या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय वर्चस्वाची लढाई असल्याची चर्चा रंगली आहे. महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान विकास गोगावले आणि सुशांत जाबरे समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला होता. या राड्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात परस्पर तक्रारी दाखल करण्यात आल्या. मात्र न्यायालयाने आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जाना नकार दिल्यानंतर, संबंधित सर्व आरोपी भूमीगत झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावरही आरोपींना अटक करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे.
राजकीय आघाड्यांवर वेगळं वळण
दरम्यान, या मारहाण प्रकरणाला राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत संघर्षाचीही पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही नेते एकमेकांच्या गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप होत आहेत. यामुळे दोन्ही नेत्यांमधील राजकीय वैर अधिक तीव्र झाले असून, त्याचाच स्फोट मतदानाच्या दिवशी हिंसाचाराच्या रूपात झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता या प्रकरणाला कायदेशीर व राजकीय अशा दोन्ही आघाड्यांवर वेगळं वळण मिळणार असल्याचं स्पष्ट होत आहे.







