स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना रोजगार
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सध्या कडक उन्हाळा सुरू झाला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात मुंबई व पुण्यावरून येणार्या भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी या भाज्यांच्या किंमती देखील वधारल्या आहेत. मात्र जिल्ह्यासह पालीत आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्यांच्या गावठी भाज्यांचे भरघोस उत्पादन येत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांना चांगला रोजगार मिळत आहे. ग्राहकांना या ताज्या गावठी भाज्यांचा चांगला, आरोग्यवर्धक व स्वस्त पर्याय उपलब्ध आहे.
जिल्ह्यात पुणे व वाशी येथील मंडईतून भाजीपाला स्थानिक बाजारपेठेत येतो. उन्हाळ्यात कमी उत्पादनामुळे येथील भाजीपाल्याची आवक कमी होत आहे आणि किंमती देखील वाढल्या आहेत. सुधागड तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्या पाड्यांवरील आदिवासी आपल्या परसात आणि डोंगर उतार व रान माळावर विविध गावठी भाज्यांची लागवड करतात. परिणामी स्थानिक बाजारात आदिवासी व शेतकर्यांनी पिकविलेल्या भाज्यांना मागणी वाढली आहे. या भाज्यांना विकून स्थानिक शेतकरी व आदिवासी महिलांच्या हाती चार पैसे देखील मिळत आहेत. सध्या बाजारात गावठी शिराळे, घोसाळे, भोपळा, कार्ली, माठ, वांगी, भेंडी, काकडी, चवळी, दूधी, गवार, मिरच्या, टॉमेटो, नवलकोल अशा बहुसंख्य गावठी भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी 10, 15 व 20 रूपये जुडी, वाटा किंवा पाव किलो इतक्या स्वस्त दरात या भाज्या मिळतात. सेंद्रिय खतावर तयार झालेल्या या भाज्या आरोग्यवर्धक आहेत.
उन्हाळ्यात देखील स्वस्त दरात, ताज्या व सहज मिळणार्या या गावठी भाज्यांना अधिक पसंती देतो. या गावठी भाज्या खाण्यास खुप चविस्ट असतात. तसेच सेंद्रीय पद्धतीने उगविलेल्या असल्याने आरोग्यास देखील उत्तम असतात.
पूनम सावंत, गृहिणी पाली
आदिवासी बांधव व स्थानिक शेतकर्यांना या भाज्या विक्री करण्यासाठी शासनाने चांगली बाजारपेठ व व जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामुळे आदिवासींचे होणारे स्थलांतर थांबण्यास मदत होईल.
रमेश पवार, कोकण संघटक, आदिवासी विकास परिषद