500 महिला,युवक,युवती उपस्थित
जोरदार घोषणाबाजी
खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे रूग्णालयातील जैविक कचर्याची विल्हेवाट लावणारा एसएमएस ऑल्विन कारखाना उभारणीस परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, बुधवारी या कारखान्यासंदर्भात झालेल्या जनसुनावणीच्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपला तीव्र विरोध दर्शविला.तसेच जोरदार घोषणाबाजीही केल्याने वातावरण कमालीचे तंग बनले.
आत्करगांव येथील जैविक कचर्यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध आहे.या संदर्भात बुधवारी (17 नोव्हेंबर ) खोपोलीतील सॅम्युअल मॉल येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.यावेळी 500 संख्येने महिला,युवक,युवती उपस्थित राहून कारखाना आमच्या गावात नको,एस.एम.एस.एन कंपनीचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी करीत आक्रामक पवित्रात घेत जनसुनावणी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.यावेळी खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली,पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढीत जनसुनावणी सुरू करताच ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित करताच कंपनीच्या एजन्सीची बोलतीच बंद झाली.
आत्करगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स.नं-231 मधील जागेत एस.एम.एस.एन ओल्वीन प्रा.लि.कंपनी जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत. यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला घेतला होता.सदर जागेपासून 200 मी अंतरावर गाव नदी तसेच 500 मी अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी,होनाड,कुंभेवाडी,आत्करगांव वाडी, बौध्दवाडा,जंगमवाडी जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्यामुळे हवा दुषित होऊन दुर्गधी पसरले, तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होऊन नदीवरील पाणी योजना दुषित होत असल्यानेसाथीचे आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो अशी भिती निर्माण झाली आहे.
यापूर्वी 13 ऑगस्ट ची जनसुनाणी रद्द करण्यात आली आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला परंतु पुन्हा 17 नोव्हेंबर जनसुनावणी घेण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, प्रादेशिक अधिकारी किल्लेदार ,खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी उपस्थित होते.
जैविक कारखाने आणून आमचा जीव घेणार आहात का, जैविक कारखाना होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विरोध करू तसेच शासनाने आमचे बाजू ऐकली नाही तर एक्स्प्रेस वे जाम करु.
अंकीत साखरे, देवन्हावे सरपंच
ग्रामपंचायतीकडून कंपनीला ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही. या कंपनीला आमचा ठाम विरोध आहे.
संदीप पाटील, शेकाप तालुका चिटणीस
यावेळी आरपीआयचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड मा.जि.प.उपाध्यक्ष भाई शिंदे, चंद्रकांत देशमुख,सुनिल सुखदरे, भाई देशमुख,समीर देशमुख यांनी आपले मत मांडत कंपनीला विरोध केला.
जि.प.बैठकीत नरेश पाटील यांनी कंपनी विरोध करताच एक मताने ठराव करीत कोणतेही कागदपत्रे कंपनी दिले जाणार नसल्याचा ठराव केला आहे. मनसेचे मनेष खवळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित करून आधिकार्यांची बोलतीच बंद केली. निवासी उपजिल्हाधिकारी,अप्पर न्यायदंडाधिकारी डॉ.पद्श्री बैनाडे यांनी लोकशाही मार्गाने झालेल्या जनसुनावणीचे अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.