नगरपरिषदेच्या महिला कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
पर्यटनाच्या दृष्टीने श्रीवर्धन शहरात पर्यटकांचा ओढा वाढत जात असुन पर्यटन व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हाॅटेल, रेस्टॉरंट तसेच समुद्र किनार्यावर सायंकाळच्या वेळेस शहाळी विक्रेते,भेळपुरी गाडी,चहाची टपरी चालकांना आर्थिक दृष्ट्या हातभार लागतं असून कोरोना काळातील आर्थिक बाबतीत दोन वर्ष वाया गेल्याने दिवाळी व जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्टयांमुळे आलेल्या पर्यटकांनी व्यवसायीकांना समाधान मिळत आहे.
श्रीवर्धन मधे पर्यटक येणारी संख्या वाढत असतानाच मठाचा गवंड येथील समुद्र किनाऱ्यावर काही टपरी चालक मनमानी करताना दिसत आहेत.आलेल्या पर्यटकांच्या जेवणाच्या ऑर्डर घेऊन सायंकाळच्या सुमारास किनाऱ्यावरील बंधाऱ्यावर पर्यटकांच्या जेवणाच्या पंगती मांडून संपूर्ण बंधारा व्यापून टाकतात. त्यामुळे सायंकाळी फेरफटका मारायला आलेले ज्येष्ठ नागरिक, स्थानिकांना जेवणाच्या पंगतीतून वाट काढत पुढे जावे लागते. स्वंयसेवक अथवा नागरिकांनी टपरीचालकास सुचना केल्यास टपरीचालक व त्याच्या कुटुंबियांकडून दादागिरीची व अरेरावीची भाषा वापरली जाते. उद्दाम व मनमानी करणाऱ्या टपरीचालकावर नगरपरिषदेनी कडक कारवाई करावी अशी स्थानिकांची मागणी केली आहे.
टपरी चालक महिलांची नगरपरिषद कंत्राटी जीवरक्षक कर्मचार्यांस धक्काबुक्की.–
मठाचा गवंड येथील समुद्र किनाऱ्यावर चहाची टपरी, शहाळी, भाजलेली कणसे अशा दोन ते तीन हातगाड्या लावणारे मारूती जाधव यांनी बुधवार (दि.०९) सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान तीस पर्यटकांची जेवणाची ऑर्डर घेऊन बंधाऱ्यावर जेवणासाठी बसवले होते. नगरपरिषदेच्या कंत्राटी जीवरक्षक रूची बोरकर यांनी जाधव यांना बंधाऱ्यावर पर्यटकांना जेवणासाठी का बसवले असा प्रश्न विचारून हटकले असता, मारुती जाधव यांची पत्नी वंदना जाधव, काजल ठाणगे या दोघींनी बोरकर यांना तु आम्हाला जाब विचारणारी कोण असे विचारत धक्काबुक्की केली. कर्तव्यावर असतांना जीवरक्षक रूची बोरकर यांना धक्काबुक्की केलेल्या महिलांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का?
समुद्र किनाऱ्यावर मठाचा गवंड व शासकीय विश्रामगृह परिसरात सायंकाळच्या सुमारास चहाटपरी चालक,भेळपुरी, वडापावच्या गाड्या उभ्या असतात. ह्यामधे बहुतांशी विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. नगरपरिषदेनी विनापरवाना व्यवसाय करीत असलेल्या व्यवसायीकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
तसेच समुद्रात पोहण्यासाठी आलेले पर्यटक हे समुदात पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर अंर्तवस्त्र ही बंधाऱ्यावर टाकून देत किळसपणाचे प्रदर्शन दाखवतात. तसेच समुद्र किनाऱ्यावरील नगरपरिषदेच्या प्रसाधनगृहात रिकाम्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्या टाकत असल्यामुळे महिलावर्गाची गैरसोय होताना दिसते.