। पेण । प्रतिनिधी ।
हमरापूर विभागामध्ये सुनील तटकरे यांनी युतीधर्म न पाळता बोलघेवड्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून हट्टाने भाजपच्या दोन्ही पाटलांना डावलून सभा घेतली. कार्यकर्ते न जमल्याने पूर्ण सभेचा फियास्को झाला. परंतु, हमरापूर विभागातील जागरूक मतदारांनी तटकरेंवर प्रश्नांचा भडीमार करून बोलतीच बंद केली.
गेल्या पाच वर्षात हमरापूर विभाग आपल्याला का आठवला नाही. हमरापूर हा कोकण रेल्वेचा थांबा असून, देखील एकही लांब पल्ल्याची गाडी थांबत नाही? आपले चिरंजीव आमदार अनिकेत तटकरे हमरापूर विभागामध्ये येऊन नुसतेच मिरवून गेले. भाताचे पंचनामे झालेत. आपल्याला नुकसान भरपाई तातडीने मिळेल असे सांगून गेले. परंतु, आजतागायत नुकसान भरपाईचा एक रुपया ही मिळाला नाही. उगीच आम्हा गरीब शेतकर्यांच्या भावनांशी खेळू नका. 2019 च्या निवडणुकीमध्ये आम्ही आपल्याला प्रामाणिकपणे मतदान केले. परंतु, आपल्याला कधी हमरापूर विभाग आठवला नाही. आज पुन्हा आपण हमरापूर विभागामध्ये येऊन पाच वर्षांपूर्वीची पुनरावृत्ती करीत आहात. आम्ही आपल्यावर विश्वास ठेवायचा का? या प्रश्नांना खासदार सुनील तटकरेंजवळ उत्तर नव्हते. महत्त्वाची बाब म्हणजे प्रश्न विचारणारे कार्यकर्ते हे महायुतीमधील घटक पक्षाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे एकंदरीत नेते सर्व अलबेल आहे असे दाखवत असले तरी कार्यकर्ते आणि नेत्यांचा सुसंवाद होत नाही एवढे नक्की. त्यातच जे प्रश्न हमरापूर येथे मांडण्यात आले ते सर्व वस्तुस्थितीला धरून असल्याने खासदारांचे ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे धाडसही झाले नाही. एकंदरीत सर्वसामान्य मतदारराजाने लोकप्रतिनिधीची बोलतीच बंद केल्याचे चित्र हमरापूर येथे पहावयास मिळाले