| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, तरीदेखील कर्जत तालुक्यातील तिन्ही नद्या आणि नाले या धोक्याच्या पातळीवर जाऊन वाहात नाहीत. परंतु, या सततच्या पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने त्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, कर्जत तालुका प्रशासनाने अद्याप कोणत्याही दारदग्रस्त कुटुंबाला स्थलांतरित केलेले नाही.
कर्जत तालुक्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे तालुक्यातील बळीराजा भातशेतीवर पडलेल्या रोगराईपासून मुक्त झालेला दिसून येत आहे. दररोज साधारण दोनशे मिली पाऊस मागील दोन दिवस झाला असल्याने भाताची शेते दुथडी भरून वाहात आहेत. दुसरीकडे सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहात असल्यातरी तालुक्यातील तीन प्रमुख नद्या या धोक्याच्या पातळीच्या खाली आहेत. उल्हास नदीचा कर्जत येथील बंधारा हा दोन मीटर खाली असून, उल्हास नदीवर असलेल्या कोणत्याही पुलावरून पाणी वाहात नाही. त्यामुळे संततधार पावसानंतरदेखील तालुक्यातील उल्हास, पोश्री आणि चिल्हार तसेच पेज या नद्या भरून वाहात असून, नालेदेखील भरून वाहात आहेत. मात्र, नद्या आणि नाले भरून वाहत असताना कोणत्याही ठिकाणी महापुराची स्थिती नसल्याने रस्त्यांवरील वाहतूक बंद होण्याच्या घटना घडलेल्या नाहीत. काल तालुक्यात 175 मिली पाऊस झाला असून, माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी हा पाऊस 254 मिली एवढा झाला आहे. पावसामुळे माथेरान शहरातील नागरिकांना घरात बसून राहण्याची वेळ आली आहे.
कर्जत तालुक्यात दोन ठिकाणी शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळून नुकसान झाले आहे. सावेळे येथील मंगेश सोनवणे यांचे घराची भिंत कोसळली असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र महसूल खात्याने तात्काळ पंचनामा करून नुकसानी माहिती महसूल विभागाला दिली आहे. तर तलाठी सजा गौरकामत बारणे येथील भाऊ नागो मोडक यांच्या घराची रात्री 11 ते 12 सुमारास भिंत कोसळून अंशतः नुकसान झाले, मात्र जीवितहानी नाही. मंगळवारी सकाळी महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.
कर्जत तालुक्यात कर्जत शहरातील कचेरी खालील मुद्रा गाव, खांडपे ग्रामपंचायतमधील सांगवी, उमरोली ग्रामपंचायतमधील पाली वसाहत, नेरळ ग्रामपंचायतमधील आंबेवाडी या दरडग्रस्त गावातील लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र, त्यातील कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतरण प्रशासनाने केलेले नाही. पळस दरी भागातील ठाकूर वाडी ही देखील दरडीचे छायेत असून, तेथील आदिवासी लोकदेखील सलग पावसामुळे भीतीमय वातावरणात आहेत. मात्र, प्रशासनाने कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतरण केले नाही, अशी माहिती तहसीलदार डॉ. धनजंय जाधव यांनी दिली आहे.









