। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळजवळील ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतून वाहणार्या नाल्याच्या पाण्यात एक अनोळखी व्यक्ती वाहून गेली. दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या घटनेत नाल्याच्या पाण्यातून वाहून गेलेली व्यक्ती उल्हास नदीच्या प्रवाहात गेली आणि बेपत्ता झाली. दरम्यान, संबंधित तरुण कोणत्या गावातील आहेख् याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
माथेरानच्या डोंगरातील पाणी भडवळ आणि ममदापुर गावाच्या हद्दीतून वाहणार्या नाल्यातून रेल्वे फाटक भागातील वीटभट्टी परिसरातून उल्हास नदीला जाऊन मिळते. तेथील पेशवाई रस्त्याच्या बाजूला ममदापुर ग्रामपंचायतचे डम्पिंग ग्राउंड आहे. त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये ग्रामपंचायतीची घंटागाडी कचरा टाकण्यासाठी गेली होती. त्या घंटागाडीवर चार कामगार काम करतात. त्यातील एका कामगाराला नाल्यातून कोणीतरी वाहत जात असल्याचे दिसून आले. कान्हू निर्गुडा या कामगाराने ओरडून ती माहिती आपल्या तीन सहकार्यांना सांगितली आणि ते तिन्ही कर्मचारी डम्पिंग ग्राऊंडच्या दगडी कुंपणावरून नाल्याच्या कडेने धावत गेले. मात्र नाला पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतो. अशातच गेली तीन दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळे उल्हास नदी काठोकाठ वाहत आहे. त्यामुळे ते कर्मचारी नाल्यातून वाहत जाणार्या तरुणाच्या दिशेपर्यंत पोहचत असतानाच तो वाहत जाणारा अनोळखी तरुण उल्हास नदीच्या पात्रात गेला. परिणामी कर्मचारीदेखील काहीही करु शकले नाही.
ममदापुर ग्रामपंचायतच्या कर्मचार्यांनी झालेली घटना ग्रामविकास अधिकारी संजय राठोड यांना सांगितली. ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून नेरळ पोलिसांना हि माहिती मिळाली. त्यानंतर नेरळ पोलिसांनी ममदापुर ग्रामपंचायत आणि दामत- भडवळ गावात माहिती घेतली आणि कोणी घराबाहेर गेला आहे काय, याची माहिती घेतली. मात्र घटना दुपारी एकच्या सुमारास घडली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत नाल्याच्या पाण्यातून उल्हास नदीत वाहून गेलेल्या तरुणाची ओळख पटली नाही. दामत गावातील तरुण त्या नाल्यावर मासे पकडण्यासाठी जात असत. त्यामुळे त्यापैकी कोणी वाहून गेला असेल, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र स्थानिक कोणत्याही गावातील तो वाहून गेलेला तरुण नाही, हे स्पष्ट झाले आहे.
वाहून गेलेल्या तरुणांबद्दल एक प्रसिद्धीपत्रक पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांनी प्रसिद्ध केले आहे. आपल्या घरातील कोणी बेपत्ता असेल तर तात्काळ नेरळ पोलीस ठाणे येथे संपर्क करण्यास सांगितले आहे. तर वाहून गेलेल्या 30 – 35 वर्षे वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे यांनी उल्हास नदीच्या काठी असलेल्या गावातील पोलीस पाटील यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
2021 मध्ये याच नाल्यातून वाहून दोघांचा मृत्यू
गतवर्षी मध्यरात्री सर्व झोपेत असताना याच नाल्याच्या कडेला असलेल्या बैठ्या चाळीमध्ये पाणी शिरले होते आणि त्यात बाप लेक वाहून गेले होते आणि त्यात त्यांचा मृत्त्यू झाला होता.
उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ
सतत कोसळत असलेल्या पावसामुळे उल्हासनदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. त्यामुळे नदीचे पाणी काठोकाठ असून वाहून गेलेला तरुणच शोध घेणे कठीण झाले आहे.