ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
। वेणगाव । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात वेणगाव ग्रामपंचायत हद्दीतीत मोठे वेणगाव येथील चिंचेच्या आदिवासी वाडीत गेल्या महिन्या पासून पाणी टंचाईचे भिषण संकट ओढावले आहे. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वाडीत असणार्या इंधन विहिरला जोडून एक पाणी साठवण टाकी उभी करून त्याद्वारे वाडीत नळ कनेक्शन दिले आहेत, तसेच याच वाडीत एक नवीन बोरवेल मारली आहे. ही बोरवेल नादुरुस्त झाली असून येथील पाण्याच्या टाकीला गेल्या वर्षापूर्वी छिद्र पडून नादुरुस्त झाली असल्याचे येथील आदिवासी नागरिकांनी ग्रामपंचायतीमध्ये तक्रार केली होती. ग्रामपंचायतीने त्या टाकीची आतून नुसती मलमपट्टी केल्याने काही दिवसाने पुन्हा छिद्र पडून टाकीतून पाणी गळू लागले. तसेच मोटार पंप एक महिन्या पासून बंद पडला आहे. त्यामुळे वाडीत पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे. येथील वाडीतील महिलांनी ग्रामपंचायतीत अनेकवेळा तक्रार करूनही सदर ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याची खंत महिला व्यक्त करीत आहेत.
- ग्रामपंचायत अनेकवेळा या वाडीतील नळ पाणी योजनेवर खर्च करीत आली आहे, पण येथील वाडीतील मुले पाण्याच्या टाकीला दगडी मारून टाकी व नळ नादुरुस्त करत असून वाडीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. – अरूण कारले, ग्रामसेवक अरूण कारले
- आम्ही बाया रोडच्या पलिकडून पाणी आणतो. गाडीने उडवले मग, याला जबाबदार कोण राहणार. – नवसी वाघमारे, ग्रामस्थ
- एकाच कामावर किती वेळा खर्च करायचा. वाडीतील लोक त्यांच्यासाठीच असणार्या नळ पाणी योजनेचा ते योग्य तो उपयोग करून घेत नाहीत. तरीही आम्ही यांच्यासाठी पाण्याची सोय करत आहोत – अभिषेक गायकर, सरपंच