शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

गडावरील कामांना तलावाचे पाणी
। महाड । प्रतिनिधी ।

ऐतिहासिक किल्ले रायगडावर असलेले पाणी स्त्रोत मे महिन्यात कमी होत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील कामाकरीता वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पुरातत्व विभागाला लेखी पत्राद्वारे देण्यात आले आहेत.


प्रतिवर्षी छ.शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर भव्य स्वरूपात साजरा केला जातो. याकरिता रायगडावर जय्यत तयारी केली जाते. गेली दोन वर्षे हा सोहळा कोरोनाच्या सावटाखाली साध्या पद्धतीने साजरा झाला. मात्र यावर्षी निर्बंध शिथिल केल्याने सोहळा जल्लोषात साजरा होण्याची शक्यता आहे. गडावर येणार्‍या लाखो शिवभक्तांना यावेळी पिण्याच्या पाण्याची सुविधा गंगासागर आणि कोलिम तलावामधून केली जाते. यावर्षी तापमानात झालेलय कमालीच्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वत्र डोके वर काढत आहे. त्यातच गडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे सुरु आहेत. जून महिन्यात येणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्यालादेखील याच तलावातील पाणी वापरले जात असल्याने पाणी टंचाई काळात गडावरील कामांना गंगासागरमधील पाण्याचा वापर करू नये अशा सूचना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने पुरातत्व विभागाला केल्या आहेत. त्याबाबतचे पत्र २९ मे रोजी देण्यात आले आहे.


किल्ले रायगडावर गंगासागर, हत्ती तलाव, बारा टाके, कोलिम तलाव, हनुमान टाके इत्यादी पाणी स्त्रोत आहेत. यापैकी गंगासागर आणि कोलिम तलाव मधील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी वापरले जाते. मात्र या तलावातील पाण्याची पातळी मे महिन्यात कमी होते. शिवाय शिवजयंती, शिवपुण्यतिथी, यानिमित्ताने गडावर पर्यटकांची आणि शिवप्रेमींची गर्दी असते. अशा वेळी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात होतो. हत्ती तलावाची गळती काढल्याचा दावा सद्या सुरु असलेल्या कामावरील यंत्रणेने केला होता मात्र सद्या हत्ती तलावात पाणी उरलेले नाही. गडावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुविधा गेली अनेक वर्षापासून सुरु आहे. मात्र ही नळपाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्याने आणि रायगड प्राधिकरणच्या कामात नव्याने समाविष्ट झाल्याने नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे अन्य ठिकाणचे पाणी गंगासागर मध्ये आणणे किंवा इतर ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य करण्याचे काम अद्याप सुरु झालेले नाही. यामुळे गडावर सुरु असलेल्या कामांवर गंगासागर मधून पाण्याचा होत असलेला अमर्याद उपसा थांबवण्याच्या सूचना पुरातत्व विभागाला करण्यात आले आहेत.


पुरातत्व विभाग अनभिज्ञ
किल्ले रायगड ज्यांच्या ताब्यात आहे त्या पुरातत्व विभागाचे केअर टेकर राजेंद्र यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचे कोणतेच पत्र आपल्याकडे आलेले नाही असे सांगून याबाबत आपल्याला कांहीच माहिती नसल्याचे सांगितले. रायगडावर संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता एक जबाबदार अधिकारी म्हणून पुरातत्व विभागाचे लक्ष असणे गरजेचे आहे. शिवभक्तांच्या सोयीसुविधांकडे केल्या जाणार्‍या दुर्लक्षामुळे पुरातत्व विभागाच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version