ग्रामसेवक, सरपंच, सदस्यांकडून दंडवसुली करावी
जिल्हाधिकार्यांकडे केशव तरे यांची मागणी
| नेरळ | वार्ताहर |
पाटबंधारे उपविभाग कर्जत यांच्यामार्फत लबदी गार्डन्स या खासगी गृहप्रकल्पाने उल्हास नदीतून अनधिकृतरित्या पाणीउपसा केल्याप्रकरणी दहिवली ग्रुप ग्रामपंचायतर्फे वरेडी यांना 10 लाख 48 हजार 596 रूपये दंड आकारला आहे, त्याची भरपाई महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 178 नुसार ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच आणि सर्व सदस्य यांच्याकडून वसूल करण्याची जिल्हाधिकारी प्रशासनाकडे ग्रामस्थ केशव तरे यांनी मागणी केली आहे.
सार्वजनिक पाटबंधारे उपविभाग, कर्जत यांना वेळोवेळी लबदी गार्डन्स या खासगी गृहप्रकल्पाद्वारे उल्हास नदीतून केलेल्या अनधिकृत पाणीउपसाबाबत तक्रार कळविण्यात आली होते. तसेच, याप्रकरणी माहिती अधिकारात या व्यावसायिकाने स्वतःच्या गृहप्रकल्पास पाणीउपसा करण्यासाठी कोणत्याही परवानग्या घेतल्या नसल्याचेही स्पष्ट झाले होते. विविध स्तरावर याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीच कारवाई याबाबत न झाल्याने गेल्या 1 डिसेंबर 2021 रोजी उपोषणाचा दणका देताच संबंधित विभागाकडून प्रथमदर्शनी 41 लाख दंड आकारल्याची माहिती उपोषण स्थगितीदरम्यान दिली होती. पुढे, ही दंडवसुली झाली की नाही, याबाबत पाठपुरावा केला असता पाटबंधारे विभागाकडून जी माहिती मिळाली ती खरेच अंचबित करणारी आणि न पटणारी होती. चूक केलेल्या लबदी गार्डन्सला फक्त दोन हजारांच्या आसपास दंड आणि दहिवली ग्रुप ग्रामपंचायत तर्फे वरेडी यांना तब्बल दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहाण्णव रूपये दंड आकारल्याचे समोर आले आहे.
तसेच पाटबंधारे विभागाने जी दंडात्मक कारवाई लबदी गार्डन्सवर केलेली आहे ती खरोखरच हास्यास्पद असून यामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तक्रारदार केशव तरे यांनी केला आहे. याच विभागाकडून वारंवार नोटीस पाठवून लबदी गार्डन्सला पाणीउपसाबाबत घेतलेल्या परवानग्यांची विचारणा करण्यात आली होती. गेली दोन वर्षे हे असेच सुरू असताना अचानक लबदी गार्डन्सने 2022 मध्ये पत्राव्दारे दिलेल्या माहितीत सदर प्रकल्पास बोअरवेलव्दारे पाणीउपसा केल्याची बाब ग्राह्य धरण्यात आली, ज्याचा कुठेही उल्लेख नव्हता. नदीकिनारी पाणीउपसा करण्यासाठी पंप स्टेशन आणि 25 एची ची मोटर लावल्याचे नायब तहसीलदार यांच्या पाहणीतही सिद्ध झाले असताना, आज अचानक या बाबी कुठून उपलब्ध झाल्या हेच कळत नाही. शिवाय, जर 2019 ला जिल्हाधिकारी यांना ग्रामपंचायत यांनी लबदी गार्डन्सला पाणी पुरविण्यास सक्षम असल्याचे पत्र दिले, मात्र योजना 2021 एप्रिल रोजी बक्षिस स्वरूपात घेतली आणि तोपर्यंत कोणत्याही स्वरूपात पाणी पुरवठा केला नसल्याने करवसुली केली नसल्याचे माहिती अधिकारात उत्तर दिले असताना, याप्रकरणी ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभाग दोघेही लबदी गार्डन्सला वाचविण्याचा प्रयत्न करत असून, याचा भुर्दंड विनाकारण स्थानिकांनी का भरावा, हा प्रश्न आहे आणि म्हणून 178 नुसार हा दंडाची रक्कम समस्त ग्रामपंचायत ग्रामसेवक, सरपंच आण सदस्य यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
उपोषणाचा इशारा
याप्रकरणी वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष का करत आहेत तसेच, सद्यःस्थितीत उल्हास नदीतून अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध नसताना अशाप्रकारे चोरीचे प्रकार वाढत असल्याने येणार्या काळात पाणीटंचाई भासून येथील स्थानिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. तसचे, या पाणीचोरीचा भुर्दंड स्थानिकांच्या माथी आला तर त्याविरोधात ग्रामपंचायत आणि पाटबंधारे विभागाविरोधात उपोषणही करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते केशव तरे यांनी दिला आहे.







